शेवटी भिडे वाडा जिंकला ! १३ वर्षापासून सुरू असलेल्या प्रधीर्ग लढ्याला यश. BhideWada Rashtriy Smarak

मुंबई – दि. १७ ऑक्टोंबर | १ जानेवारी १८४८ रोजी महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात (BhideWada) देशातील पहिली मुलींची शाळा (First Girls School) सुरू केली. ती वास्तू आज खूप मोडकळीस आली आहे. या वाड्याचे संवर्धन करून त्यावर सावित्रीमाई फुलेंचे स्मारक व्हावे असे प्रत्येक फुले प्रेमींना वाटत होते. यासंबंधी पुणे महानगर पालिकेने स्मारक उभारण्याचा निर्णय घेतल्यावर, येथे खाली असणारे भाडेकरू उच्च न्यायालयात गेले आणि न्यायालयीन प्रक्रियेने स्मारक निर्णय निर्णय लांबणीवर गेला. परंतु १३ वर्षाच्या प्राधिर्ग लढ्यानंतर शेवटी भिडे वाडा (BhideWada) जिंकला.
याबाबत खूप महत्त्वाची भूमिका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून छगनराव भुजबळ यांनी पर पाडली. या विजयाविषयी त्यांनी फेसबुक वर त्यांच्या शब्दात भावना व्यक्त केल्या त्या खालील प्रमाणे
“गेल्या १३ वर्षांपासून सुरू असलेल्या आपल्या लढ्याला यश आले आहे! मुंबई उच्च न्यायालयातील खटला आपण जिंकला असून, पुणे येथील भिडे वाड्यात (BhideWada) सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे!
भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू करून क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्या ठिकाणी भारतातील स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली, त्या भिडे वाड्यात (BhideWada) सावित्रीबाई फुलेंचे स्मारक उभारण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतल्यानंतर याविरोधात वाड्यातील पोटभाडेकरुंकडून उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. सदर जागेवर दावा करतानाच या ठिकाणी शाळा असल्याचे पुरावे उपलब्ध नसल्याने महापालिकेचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद करण्यात येत होता.
परंतु यासंदर्भात पुणे महापालिकेसमवेत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून आपण उच्च न्यायालयात प्रदीर्घ लढा दिला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत यासंदर्भात वेळोवेळी बैठका घेतल्या, पुण्यामध्ये महापालिका, प्रशासन व विविध विभागांतील अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. यातून न्यायालयातील आपली बाजू आणखी बळकट करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. मी स्वतः उच्च न्यायालयातील सुनावण्यांना वेळोवेळी उपस्थित राहून या स्मारकाची बाजू भक्कमपणे मांडली. तसेच पुणे महापालिकेच्या वतीने आपल्या प्रयत्नांतून महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ आणि माजी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी देखील अतिशय समर्थपणे बाजू मांडली.
आपल्या आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या या अथक प्रयत्नांना अखेर आज यश आले असून मुंबई उच्च न्यायालयाने स्मारकाविरोधातील याचिका फेटाळली आहे. हा क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांचा विजय असून आता लवकरात लवकर भिडे वाड्यामध्ये (BhideWada) क्रांतीज्योती सावित्रीमाई यांचे स्मारक उभारले जाईल आणि मुलींची शाळा देखील पुनरुज्जीवित करण्यात येईल.
यासाठी देखील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.”
साभार -छगन भुजबळ फेसबुक पेज
सदर विजयाचा आनंदोत्सव संपूर्ण महाराष्ट्र फुले प्रेमींनी पेढे वाटत, फटाक्यांची आतषबाजी करत, फुले दाम्पत्याला हार अर्पण करत साजरा केला. या लढ्याला असंख्य फुले प्रेमींनी जे बळ दिले ज्यांचे सुद्धा क्रांतिसूर्य न्यूज कडून हार्दिक अभिनंदन.