भिडे वाड्यासाठी महिला संघटना रस्त्यावर: प्रा. हरी नरके

१७५ वर्षांपूर्वीची मुलींची पहिली शाळा असलेल्या भिडेवाडयाचे पुनर्वसन व्हावे यासाठी आज काही महिला संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. दि. २४/९ रोजी सत्यशोधक समाजाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सुरू होतोय. त्यानिमित्त या विषयाला मिळणारी चालना महत्वाची आहे. हा वाडा कधीही पडेल अशा जिर्णावस्थेत आहे. त्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी अनेकांची इच्छा आहे. त्यासाठी अधूनमधून आंदोलने होतात, बातम्या येतात. समाज माध्यमावर लोक हळहळ व्यक्त करतात. अनेकांची इच्छा असताना कामाला गती का मिळत नाही?
१) हा मामला गेली वीसेक वर्षे मुंबई उच्च न्यायालयात पडून आहे. कारण हा वाडा खाजगी मालकीचा असून तिथे काही भाडेकरू, दुकानदार आणि एक बँक आहे.त्यांच्या काही मागण्या आहेत.ते त्यासाठी कोर्टात गेलेत. न्यायालयाबाहेर तोडगा काढण्यासाठी मध्यंतरी अजितदादा पवार व छगन भुजबळसाहेब यांच्या माध्यमातून आपण प्रश्न सुटण्याच्या अगदी नजिक पोचलो होतो. इतक्यात ठाकरे सरकार पाडले गेले. प्रश्न पुन्हा अधांतरी लटकू लागला.
२) भिडेवाड्यासमोर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे.तिथे गणेश उत्सवात दरवर्षी २५ ते ३० हजार महिला अथर्वशीर्ष म्हणण्यासाठी जमतात.त्यांचे फोटो छापून, बघा,बघा, इकडे गर्दी, वाड्याकडे कुणीच नाही अशी हळहळ व्यक्त केली जाते. चार पुरोगामी अस्वस्थ होतात. चिडचिड करतात. राजकारण्यांना काहीच करीत नाहीत म्हणून शिव्या देतात नी आपला राग काढण्यासाठी लवकरच प्रश्न सोडवण्याचा कठोर निर्धार करून पुढील वर्षाची वाट बघू लागतात. निर्धार मात्र कडवा असतो. प्रामाणिक असतो. ते पुतीन पासून बायडेनपर्यंत अनेकांना हा प्रश्न सोडवण्यासाठी मार्गदर्शन करतात.
३) महिला संघटना, शिक्षक, प्राध्यापक, अधिकारी जे जे लाभार्थी आहेत ते सर्वच प्रामाणिक आहेत. बलदंड इच्छाशक्ती आहे. इतरांनी काही तरी करावे म्हणून ते अहोरात्र प्रार्थना करतात. जमेल तसे बालाजी,शिर्डी, दगडु शेटला जाऊन पूजा करतात. नवस बोलतात. कारण प्रयत्न प्रामाणिक असतात. शिकल्या, सवरलेल्या बायका अतिशय तळमळीने ह्या प्रश्नासाठी तळतळ करतात. नवरामुलांना घेऊन त्यासाठी मल्टीप्लेक्सला जाऊन सिनेमा बघतात. मस्त हॉटेलमध्ये जाऊन किंवा सहलीला जाऊन एनर्जी गोळा करतात. एन्जॉय करा म्हणजे भिडेवाडा मार्गी लागेल ही प्रांजळ भावना त्यामागे असते.
४) यातला बहुजन समाज सर्वात जास्त झटणारा.तो आयुष्यभरात या वाड्याकडे फिरकतसुद्धा नाही. मधूनमधून जेवणाच्या टेबलावर हा विषय बोलला की त्याची लाट तयार होईल, नी हा प्रश्न ताबडतोब सुटेल यावर त्याची ठाम श्रद्धा आहे. त्यासाठी मानसिक ऊर्जा जमवण्याचे काम हा वर्ग गेली १७५ वर्षे करीत आहे.हाच समाज गणेशोत्सव,नवरात्री, दही हंडी, शिवजयंती, निवडणुका, जत्रा,बैलगाडा शर्यती, कुस्त्या, तमाशे यांच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतो. वाढदिवसाच्या पार्ट्या, नेत्यांचे सत्कार, फ्लेक्स, यावर खिसा मोकळा करायला तयार असतो. मात्र भिडेवाडा प्रश्न इतरांनी सोडवावा अशी कळकळ बाळगतो.
५) पत्रकार, साहित्यिक, आम्ही लोक अतिशय प्रामाणिक. हा विषय पुढे आला की गेल्या २५ वर्षात दोनदा आपण त्यावर दीड मिनिटे बोललो होतो वा दीड ओळींची पोस्ट लिहिली होती, याची जाहिरात करतो. अतिशय उत्साही, प्रामाणिक आणि बांधिलकी मानणारा बुद्धिजीवी…[ads1]
तर प्रश्न सुटण्यासाठी सगळेच इमानदारीने झटत आहेत. पाच पन्नास संघटना अहोरात्र झटण्याचा दावा करतात. परिणामी प्रश्न तसूभरही पुढे सरकलेला नसतो. कारण मुळात प्रश्न न्यायिक, राजकीय, आर्थिक, कायदेशीर आणि सामाजिक आहे.उत्तर व्यक्तिगत कसे असेल?[ads2]
असे का होते?
कारण भिडेवाड्याचा आता आम्हाला भौतिक यशासाठी काय उपयोग? काय फायदा? जे काम बोलून भागते त्यासाठी एनर्जी का खर्च करायची? त्याचा लाभ काय?
आम्ही मध्यमवर्गीय सर्वाधिक प्रामाणिक. मराठी शाळा टिकवता याव्यात यासाठी आपली मुलं इंग्रजी माध्यमात घालतो. मराठी सिनेमा चालावा म्हणून हिंदी – इंग्रजी सिनेमे बघतो. आम्ही सर्वात प्रामाणिक लोक.[ads3]
आज मोर्चाला आलेल्या महिला अगदी नटून थटून, नव्या कोऱ्या साड्या नेसून, दागिने घालून आलेल्या होत्या. छान वाटले.
महिला आणि मागास बहुजन यांना उज्वल भवितव्य आहे.
भिडेवाडा प्रश्न ताबडतोब सुटला पायजेल हाये![author title=”प्रा.हरी नरके” image=”https://krantisuryanews.in/wp-content/uploads/2021/08/PicsArt_08-10-12.12.31-e1628583574837.png”]जेष्ठ ओबीसी विचारवंत, साहित्यिक, महात्मा फुले साहित्याचे लेखक[/author]
भिडे वाडा हा श्री नरके साहेबांचा लेखावरून असे दिसते की वाडा खासगी आहे व त्यामुळे तेथील रहिवासी ,दुकानदार यांच्या कांही समस्या व प्रश्न
उपस्थित झाले आहेत व वाद मुंबई हाय कोर्ट येथे
प्रलंबित आहे।
यावर उपाय म्हणजे शासकीय पातळीवर तेथे अतिरिक्त fsi ला मान्यता मिळवून ,आहे त्या तो वाडा तसाच ठेवून ,वाड्यावर 4 थ्या मजल्यांनातर टॉवर (high rise)उभारून विस्थापित होणाऱ्या स्थानिक जनतेस व व्यापारी वर्गास तेथे पुनर्वसित करता येईल।भुजबळ साहेबांचे माध्यमातून हे सहज शक्य आहे।कृपया विचार व्हावा।
देवराम भुजबळ ,9869266211