छत्रपती शाहू महाराज यांचे विचार प्रत्येकाच्या घरात आणि मनात रुजविण्यासाठी प्रयत्न करा – मंत्री छगन भुजबळ
नाशिक,दि.६ मे | छत्रपती शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्राला छत्रपती शाहूंच्या रूपाने दुसरा लोककल्याणकारी राजा मिळाला असल्याचे सांगत सद्याच्या परिस्थिती देशातील राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येत आहे. त्यामुळे छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांची उजळणी करून ते लोकांमध्ये रुजविण्याची आवश्यकता आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांमुळेच महाराष्ट्राच पुरोगामीत्व टिकून राहील असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक प्रा.डॉ. मंजुश्री जयसिंगराव पवार यांनी केले.
छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत रावसाहेब थोरात सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी माजी आमदार जयवंतराव जाधव, अपूर्व हिरे, डॉ.शेफाली भुजबळ, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुने, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, सचिन पिंगळे,भाऊसाहेब खताळे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, माजी नगरसेवक गजानन शेलार, जगदीश पवार, सुषमा पगारे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर दराडे, डॉ. योगेश गोसावी, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, गौरव गोवर्धने,निवृत्ती अरिंगळे, संजय खैरनार, कविता कर्डक, शंकर मोकळ, अमर वझरे, डॉ.नागेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रा.डॉ.मंजुश्री पवार म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याने पावन झालेल्या भूमीत छत्रपती शाहू महाराज यांच्यावर बोलण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. राजा असून सामाजिक कार्यात त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचल. त्यामुळेच ते लोकराजा होते.महात्मा फुले यांनी सुरू केलेलं समतेच कार्य शाहू महाराजांनी आपल्या काळात पुढे सुरू ठेवलं. परिवर्तनाची धुरा महात्मा फुले यांच्याकडून शाहू महाराजांकडे व त्यानंतर ती पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आली. परिवर्तनाची ही धुरा यशस्वीपणे सांभाळून छत्रपती शाहू महाराजांनी ती सर्वस्पर्शी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, ब्राह्मणशाही मोडीत काढण्याच काम छत्रपती शाहू महाराज यांनी करत बहुजन समाजाला न्याय मिळवून दिला. ब्रिटिश सरकार जेवढा खर्च मुंबई प्रांतात केला जात नव्हता. तेवढा खर्च शाहू महाराज आपल्या संस्थानातील शिक्षण विभागासाठी खर्च करत होते. त्याकाळी त्यांना देशातील अनेक नेत्यांकडून विरोध होत होता. त्याला न जुमानता त्यांनी शिक्षणाच काम सुरू केलं. मागासवर्गीय समाजाच्या शिक्षणासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचले. वेदासाठी वेध नव्हे तर हक्कासाठी वेदांचे शिक्षण उपलब्ध करून दिल. जातिव्यवस्था संपवून अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्याला उच्च वर्णीयांच्या सोबत बसून शिक्षण घेण्याचा अधिकार मिळवून दिला असे त्यांनी यावेळी सांगितले.
त्या म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज हे योद्धा सुधारक होते. त्यांनी बदलाची सुरुवात आपल्या घरातून केली. त्यांचे विचार आणि कार्य यात फरक ठेवला नाही.शिक्षणाचा वंगण घातल्याशिवाय स्त्रियांचा विकास होऊ शकत नाही. हे शाहू महाराजांनी लक्षात घेऊन स्त्रियांना शिक्षण देण्यासोबत पाच महत्वाचे कायदे करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यांनी महिलांसाठी केलेले कायदे स्त्रीच्या मुक्तीसाठी, उद्धारासाठी अतिशय महत्वाचे ठरले असे सांगत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद समतेची ज्योत समाजात रुजविण्याचे काम करत आहे हे अतिशय अलौकिक कार्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, देशात राजे अनेक झाले मात्र काही प्रमुख राजे आपल्या लक्षात राहतात याचं कारण म्हणजे त्यांनी केलेली लोकोपयोगी कामे आहे. छत्रपती शाहू महाराज हे महात्मा फुलेंच्या विचारांवर काम करत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मदत केली. त्यामुळे मोठं नेतृत्व देशापुढे आलं. त्यामुळे छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही आपली दैवत आहे. आपण त्यांना दैवत का मानतो. हे प्रत्येक घरात तसेच प्रत्येकाच्या मनात पोहचविण्यासाठी त्यांचा इतिहास जनतेपर्यंत पोहचला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
ते म्हणाले की, शाहू महाराजांचा नाशिक शहराचा अत्यंत जवळचा संबंध आहे. वसतिगृहाना त्यांनी अधिक मदत केली. सत्यशोधक चळवळीच्या कामाला त्यांनी अधिक प्रोत्साहन दिले. बहुजन समाजाच्या शिक्षणाच्या कामासाठी पुढे आलेल्या गणपतराव मोरेंसह विविध लोकांच्या मागे ते खंबीरपणे उभे राहिले. त्यांना आधार दिला. आधुनिकतेची कास धरून त्यांनी देशाला पुढे नेण्यासाठी केलेलं योगदान अतिशय मोलाचे आहे.त्यांच्या विचारांचा आदर्श समाजात जाण्यासाठी अशा प्रकारची व्याख्याने नियमित आयोजित करण्यात यावे असे आवाहन करत छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्ताने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते वाचनालयांना पुस्तके व तैलचित्रांची भेट
छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनावरील पुस्तके व तैलचित्रांचे जिल्ह्यातील सर्व शासकीय वाचनालयाना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने भेट स्वरूपात देण्यात येत आहे. त्यानुसार या प्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात पाच वाचनालयाना पुस्तके व तैलचित्रांचे वाटप करण्यात आले.