आपला जिल्हा

तृतीयरत्न : अंतर्मुख करणारी नाट्यकृती- साहित्यिक अरविंद शिंगाडे

बुलढाणा येथे दि. १८ एप्रिल २०२२ रोजी सहकार विद्या मंदिराच्या प्रशस्त सभागृहात महात्मा ज्योतिराव फुले लिखित ‘तृतीय रत्न’ या नाटकाचा प्रयोग संपन्न झाला. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या या ऐतिहासिक साहित्यकृतीचे नाट्यीकरणाचे साक्षीदार होता आले, हा एक अविस्मरणीय अनुभव. उत्कृष्ट दिग्दर्शन, परिपूर्ण नेपथ्य, साजेशी ध्वनी व प्रकाश व्यवस्था, सुंदर संगीत संयोजन आणि नाट्य कलावंतांनी आपल्या अभिनयाने  आपल्या भूमिकेला दिलेला न्याय इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण बाबींमुळे महात्मा ज्योतिराव फुले लिखित ‘तृतीयरत्न’ या नाटकाचे ऐतिहासिक सादरीकरण बुलढाण्यातील प्रेक्षकांना अनुभवता आले. निमित्त होते महाराष्ट्र शासनाच्या महाज्योतीच्या वतीने सादर करण्यात येत असलेले महात्मा ज्योतिराव फुले लिखित व अनिरुद्ध वनकर दिग्दर्शित नाटक तृतीयरत्नचा प्रयोग.

बुलढाणा शहरातील नाट्य रसिक अगोदरच खूप चोखंदळ आणि तितकाच प्रगल्भ आहे. या प्रेक्षकांना पूर्ण प्रयोग होईपर्यंत खिळवून ठेवण्याचं काम आपल्या दमदार अभिनयाने नाटकातील कलाकारांनी केले. मधून-मधून टाळ्यांच्या गजराने मिळणारा प्रतिसाद कलाकारांचा हुरूप वाढवणारा होता. एकोणिसाव्या शतकात सामाजिक समतेच्या आणि शोषण विरहित व्यवस्थेच्या निर्मितीसाठी क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांनी तृतीय रत्न या नाटकाच्या रूपाने १८५५ मध्ये साहित्य क्षेत्रातील आपला प्रवास सुरू केला होता. महाज्योतीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तृतीयरत्न या नाटकाचे प्रयोग निश्चित केलेले आहेत .चंद्रपूरचे अनिरुद्ध वनकर यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले असून नाटकामध्ये नांदेड, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, मुंबई, अमरावती अशा विविध ठिकाणावरून कलाकार सहभागी झाले आहेत. बुलढाण्यात संपन्न झालेल्या या नाटकातील जोशीबुवा, कुणबी व त्याची पत्नी, विदुषक, ख्रिस्ती धर्मगुरू(पादरी) यांच्यासह इतर सहयोगी भूमिका प्रेक्षकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील. दमदार पद्धतीने नाट्य कलावंतांनी सादरीकरण केले. नाटक अभिव्यक्तीचे प्रशस्त माध्यम आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांचे ‘तृतीयरत्न’ हे नाटक पुस्तक रूपाने अनेकांपर्यंत अगोदर पोहोचलेले आहे. परंतु अनिरुद्ध वनकर आणि त्यांच्या संचाने या साहित्यकृतीचे नाट्यीकरण अतिशय परिश्रमपूर्वक पूर्ण केले आणि प्रेक्षकांचा त्याला मिळणारा प्रतिसाद हा नाटकाच्या यशस्वीतेवर शिक्कामोर्तब करणारा आहे.

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या जीवनकार्यात चातुर्वर्ण्य व्यवस्थेकडून शोषणाची सुनियोजित व्यवस्था सामान्य माणसाला कशी नाडवते हे अनुभवले होते. याची जाणीव झाल्याने महात्मा फुले यांनी नाटक हा साहित्यप्रकार निवडून तृतीयरत्नचे लिखाण केले होते.

जन्माला येण्याअगोदर बाळाच्या मागे ग्रह-ताऱ्यांचे दुष्टचक्र लागेल यासाठी जोशीबुवांनी पद्धतशीरपणे केलेली योजना, त्यामध्ये फसणार कुणबी जोडपं, या फसवणुकीच्या प्रवासात विवेकी साक्षीदार म्हणजे तृतीय रत्न मधील विदूषक जो जोशी बुवांची शोषणाची व्यवस्था नष्ट करू इच्छितो. कलावंतांच्या दर्जेदार अभिनयाने तृतीयरत्न मधील संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो, यात शंकाच नाही. सर्वांनी आवर्जून पहावे असे ‘तृतीयरत्न’ हे या नाट्य प्रयोगाचे वर्णन केले जाईल.

या नाटकातील महात्मा जोतीराव  फुले यांचे विचार आजही कालसुसंगत आहेत, ज्याची प्रेक्षकांना वारंवार प्रचिती येते .सामाजिक क्रांतीची बीजे रोवणाऱ्या महात्मा जोतीराव फुले या महामानवाच्या व्यक्तिमत्त्वाचे ‘सर्जनशील साहित्यिक’ हे रूपही तेवढेच दर्शनीय आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून समाजातील विषमता नष्ट करून समता प्रस्थापित करण्याच्या हेतूने एकोणिसाव्या शतकात क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी केलेल्या कायमस्वरूपी प्रयत्नांचा प्रत्यय नाटक पाहणाऱ्यांना  आल्याशिवाय राहत नाही.

या नाटकातून ‘शिक्षणानेच ह्या शोषित समाजाचा उद्धार होऊ शकतो. हे सिद्ध करण्याची क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची तळमळ प्रत्ययास येते. त्यामुळे ह्या ऐतिहासिक नाटकाचा प्रयोग जिथे कुठे असेल तिथे जाऊन आपण तो अवश्य पहा. ह्या उपक्रमाची संकल्पना ज्यांना सर्वप्रथम सुचली त्यांचे आभार मानले पाहिजेत. या नाटकाचे प्रयोग राज्यभर करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे जाहीर अभिनंदन ![author title=”अरविंद शिंगाडे” image=”https://krantisuryanews.in/wp-content/uploads/2022/04/FB_IMG_1650368303532.jpg”]व्याख्याता, साहित्यिक, खामगाव  जि . बुलडाणा, 9423445668[/author]

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button