आपला जिल्हा

महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी आपली वाट स्वत:च निर्माण करावी – डॉ. शेफालीताई भुजबळ

येवला,दि.८ मार्च :-* जागतिक महिला दिन हा अनेक वर्ष प्रामुख्याने मोठ्या शहरांमध्ये आणि उच्चभ्रू महिला वर्गातच संपन्न व्हायचा, पण आता चित्र बदलले आहे. राष्ट्र सेवा दल आणि समता प्रतिष्ठान सारख्या संस्था – संघटना महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी ग्रामीण भागातही तळागाळात जाऊन काम करित असल्यामुळे महिला आपल्या वाटा धुंडाळू लागल्या आहे. शिक्षण आरोग्य ,बचतगट यांच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या प्रमाणात बळ मिळू लागले आहे. आता आत्मनिर्भर होण्यासाठी महिलांनी नव्या वाटा तुडवायला सुरूवात केली असुन ही फार सकारात्मक बाब असल्याचे प्रतिपादन मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ. शेफाली भुजबळ यांनी येवले येथे बोलताना केले.

येवला येथील मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयाच्या प्रांगणात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यावेळी विशेष अतिथी म्हणून डॉ. शेफाली भुजबळ बोलत होत्या. या कार्यक्रमास येवले नगरपालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. संगीता नांदुरकर या विशेष सन्मानमुर्ती म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्या सुधाताई पाटील यांनी भूषविले. राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी डॉ.शेफाली भुजबळ पुढे म्हणाल्या की, आता महिला शिकून-सवरून सर्व क्षेत्रांमध्ये यशस्वी भूमिका निभावत आहे. त्यांच्या या भूमिकांमुळे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी २०० वर्षापूर्वी पाहिलेले स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आपणास आज होत असल्याचेही गौरवोद्गार डॉ.शेफाली भुजबळ यांनी यावेळी बोलताना काढले. दोनशे वर्षांपूर्वी या फुले दांपत्यांनी अथक परिश्रम करून सनातन्यांना यशस्वी तोंड देत शिक्षणासारख्या माणसाला आमूलाग्र बदलविणा-या क्षेत्रात काम केले नसते तर या मुलींनी सादर केलेल्या गीतांप्रमाणे एकही बाई आज आयुष्यात उभी राहिली नसती. समता प्रतिष्ठान ही संस्था दिव्यांग मुलांसाठी डोंगराएवढे काम करीत असून या शिक्षणाच्या जागरात शेकडो मुली आपल्या आयुष्यात संस्था उभे करीत आहे हे पाहून आपणास खूप आनंद होत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती संगीता नांदुरकर यांनी मी केलेल्या कामाचं कौतुक करणं हा भाग वेगळा आहे, मात्र त्याचे अतिसूक्ष्म निरीक्षण करून ते मानपत्रात अत्यंत चांगल्या पद्धतीने समावेश केल्यामुळे मला हर्षानंद झाला आहे. माझ्या कामाचे मूल्यमापन करणारे असे चांगले लोक या गावात असल्यामुळे मला काम करण्यासाठी बळ मिळणार आहे. माझ्या कामाचं इतकं सूक्ष्म निरीक्षण करणारे व माझ्यावर प्रेम करणारे इतके चांगले लोक या शहरात आहे याचा मला मनापासून अभिमान वाटतो. या ठिकाणी कर्णबधिर मुलांसाठी अथक परिश्रम घेऊन पुनर्वसनासाठी जे प्रयत्न केले जातात यावरून कोकाटे सरांच्या पाठीमागे एक भक्कम शिक्षकांची टीम उभी असल्याचे चित्र मी सातत्याने पाहिले आहे. या दिव्यांग शाळेमध्ये सुमारे 100 किमी वरून मुले या ठिकाणी शिक्षण व प्रशिक्षण घेण्यासाठी येतात ही खरे तर फार मोठी भूषणावह बाब आहे. भविष्यात या मुलांसाठी आपण शक्य ती सर्वतोपरी मदत करण्यास आपण तत्पर राहू असे आश्वासनही नांदुरकर यांनी यावेळी बोलताना दिले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष व समता प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून उपस्थित महिला व तरुण मुलींपर्यंत एक सकारात्मक संदेश पाठवू इच्छितो, काम करताना अनेक अडचणी येत असल्या तरी त्यावर मात करण्यासाठी या मुलांची जिद्द व मेहनत पाहूनच बळ मिळते असे उद्गारही कोकाटे यांनी यावेळी प्रास्तविकात काढले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक जिल्हा राष्ट्र सेवा दलाचे कार्याध्यक्ष दिनकर दाणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मायबोली विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब कोकाटे यांनी मानले.

कार्यक्रमास शहर व तालुक्यातील हजारावर महिला व युवती आवर्जून उपस्थित होत्या. तसेच येवला तालुक्यातील बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच एरंडगाव च्या सरपंच मंदा पडोळ, साताळीच्या सरपंच सुनंदाताई काळे, सदस्या संगीता जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अध्यक्ष नीता बिवाल, उज्वला पानमळे, वैशाली चव्हाण, शिल्पा पटेल, रेखा साबळे, विमल शहा, माधुरी पाटोळे, मंगल मढवई, रंजना गाढे, मालती पाटील, कविता झाल्टे, तेजश्री लासुरे, उषा शिंदे, संगीता भवर, रेखा दुनबळे, सुरेखा गाडे, शोभा कदम, सोनम पठारे, सरला पगारे, निकिता पाटील, अर्चना शिंदे, रेखा पांढरे, विद्या तांबे, सविता चौधरी, सुमती पाटील, अंजली येलमामे आदी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी माजी सरपंच मच्छिंद्र काळे पुंजाराम काळे, दिलीप काळे, भाऊसाहेब जगताप, गणेश गाडे, गणेश कोकाटे, अमोल सोनवणे, किरण काळे, भिकाभाऊ सोनवणे, गणेश कोकाटे, दिलीप काळे, रामनाथ पाटील, पंडित मढवई, कानिफनाथ मढवई, समीरभाई फेटेवाले, नवनाथ शिंदे, आनंदा वैद्य, आप्पासाहेब शिंदे, शरद शेजवळ, गोरख खराटे समता प्रतिष्ठानचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button