माळी युवकांनी उद्योगधंद्यात उतरावे- माळी उद्योग शिबीरात उद्योजक गोविंद डाके यांचे प्रतिपादन.
कळंब- दि.20 | माळी चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲड अग्रिकल्चर आणि माळी समाज मिशन अंतर्गत पर्याय सामाजिक संस्थेच्या सहकार्यातून कळंब येथील पर्याय सामाजिक संस्थेत उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील 200 नव युवकांचे उद्योजगता विकास एक दिवसीय शिबीर अतिशय उत्साहात पार पडले.
या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथील उद्योजक माननीय श्री गोविंद सुमन केशव डाके यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी बोलताना माननीय श्री गोविंदजी डाके यांनी युवकांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योग व्यवसायात उतरावे आणि उद्योग-व्यवसायात मधून इतरांना नोकरी देण्याची भूमिका बजावावी असे आव्हान केले. येणाऱ्या काळामध्ये नोकऱ्या तर मिळणार नाहीतच परंतु अनेक छोट्या मोठ्या उद्योगाला भरपूर वाव असून उद्योगधंद्याला लिमिट नाही. अगदी अल्प काळामध्ये सुद्धा आपण यशाची उंच उंच शिखरे गाठू शकतो हे या आजच्या जागतिकीकरणात मधून आपण शिकायला पाहिजे.
येणारा काळ हा विज्ञान व तंत्रज्ञानाचा आहे. यासाठी छोटे-छोटे स्किल आपण विकसित करून आपल्या समाजाला उद्योग व्यवसायात पुढे आणलं पाहिजे. माळी समाजाचा मूळ पिंड हा शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा आहे. यातूनच अनेक संधी आपल्याकडे आज उपलब्ध झालेल्या आहेत.सेंद्रिय शेतीला पर्याय नाही. यासाठी प्रत्येक गावात सेंद्रिय शेती करणारे आणि त्यावर प्रक्रिया करून विक्री करणारे युवक आपल्याला गावोगाव निर्माण करावयाचे आहेत असे प्रतिपादन केले.
पर्याय सामाजिक संस्थेच्या वतीने माननीय श्री विश्वनाथजी अण्णा तोडकर यांनी सांगितले की आजच्या उद्योजक परिषदेमध्ये उपस्थित असलेल्या युवकांकडून येणाऱ्या दोन वर्षात यशस्वी उद्योजकास या संस्थे तर्फे 50 हजाराचे बक्षीस व मानपत्र देऊन गौरविण्यात येईल. बुलढाणा येथील उद्योजक पुरुषोत्तम भराड यांनी स्वतः अल्प कालावधीत उभे केलेल्या तूर डाळ प्रकल्प विषयी माहिती दिली. फलटण येथील प्रगतिशील शेतकरी शरद कोल्हे आणि सतीश भराड यांनी जिरेनियम शेती याबद्दल माहिती सांगितली तर कृषी अधिकारी अरविंद जी नाळे सातारा यांनी सेंद्रिय शेतीबद्दल उपस्थितांना माहिती दिली.
समता परिषदेचे स्टार प्रचारक संतोष विरकर यांनी सदर मेळाव्यातून प्रत्येक उद्योजकाने काहीतरी छोटा-मोठा उद्योग उभारावा असे आवाहन केले. सदर “मी उद्योजक होणारच” या उद्योजकता शिबिरासाठी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा उस्मानाबाद माळी मिशनचे समन्वयक श्री संतोष भोजने लातूरचे समन्वयक तथा माळी सेवा संघाचे राज्य अध्यक्ष पद्माकर जी वाघमारे, भारत काळे, श्रावणजी उगले यांच्यासह जि प सदस्य तानाजी माळी, मनोज माळी, रणजीत गवळी यांनी अथक प्रयत्न केले. पर्याय सामाजिक संस्थेच्या वतीने निवास, प्रशिक्षण व सहभोजन मोफत पुरविण्यात आले. सदर कार्यक्रमास उस्मानाबाद, तुळजापूर, औसा, अहमदपूर, चाकूर, लातूर, आंबेजोगाई, केज सह कळंब तालुक्यातील युवकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला.