1971 युद्धात हुतात्मा झालेले विर लक्ष्मण वेरुळकर यांचा 50वा हुतात्मा दिन
इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देताना देशाची फाळणी करून भारत आणि पाकिस्तान अशा दोन देशांची निर्मिती केली. स्वातंत्र्य पासूनच या दोन्ही देशात भूभावरून वाद राहिले. पाकिस्तान नेहमी कुरघोड्या करीत भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत राहिला. त्यासाठी आजपर्यंत अनेक युद्धेही झाली. त्यापैकी 1971 (1971 indo- pak war ) चे युद्ध खूप महत्त्वपूर्ण असे आहे. 1971 मध्ये थल, जल आणि हवाई अश्या तिन्ही मार्गे युद्ध झाले. या तिन्ही ठिकाणी भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याला धूळ चारली.
9 डिसेंबर 1971 ला भारतीय नौदलाला संकेत मिळाले होते की, एक पाकिस्तानी पानबुडी हंगोर भारतीय हद्दीत घुसली आहे. या पाणबुडीला ताबडतोब नष्ट करण्याचा आदेश नौदल मुख्यालयातून देण्यात आले. त्यासाठी अँटी सबमरीन फ्रागेट आयएनएस खुखरी (khukri) आणि कृपान (krupan) ला पाठवण्यात आले. पाकिस्तानी पाणबुडी हंगोर ने पहिले टॉर्पिडो कृपान वर चालविले पण त्याचा स्फोट झाला नाही.
त्यानंतर खुखरी (INS Khukri) वर हल्ला झाला. तेथे लगेच दिवे बंद झाले. खुखरी (Khukri) चे कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांनी पाहिले की, खुखरी मध्ये दोन छिद्र झाली आहेत आणि त्यात वेगाने पाणी भरत आहे. त्याच जहाजावर जवळपास 24 अधिकारी आणि 239 जवान होते. त्यापैकी 6 अधिकारी व 61 जवाना जिवंत राहिले. तर 18 अधिकारी आणि 178 जवानांना या खुखरी जहाजासह जलसमाधी मिळून वीरगती प्राप्त झाली. भारतीय सैनिक शेवटच्या क्षणापर्यंत मोठ्या धैर्याने लढत होते.
त्यापैकी एक सैनिक होते बुलढाणा जिल्ह्यातील गोंधनापूर गावचे सुपुत्र वीर लक्ष्मण वेरूळकर.
9 डिसेंबर 1971 ला जेव्हा वीर लक्ष्मण वेरूळकर यांना वीरगती प्राप्त झाल्याची माहिती त्यांचा परिवाराला व गावकऱ्यांना मिळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरल्याचे त्यांचे ज्येष्ठ बंधू वासुदेव वेरुळकर यांनी सांगितले. 9 डिसेंबर 1971 ला गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर त्यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याच प्रमाणे गावातील प्रमुख भागात असणाऱ्या चौकाचे वीर हुतात्मा लक्ष्मण वेरूळकर असे नामकरण करण्यात आले.
1971 मध्ये त्यांच्या शहीद झाल्यानंतर गावातील व परिसरातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांच्या नावाचे वसतिगृह सुरू करण्यात आले होते. त्या वसतिगृहाला त्यांच्या मातोश्री सोनाबाई वेरुळकर यांनी 1971 मध्ये अकरा हजार रुपये (11000) देणगी दिली होती. वीर लक्ष्मण वेरूळकर वस्तीगृहात आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करता आले. वीर लक्ष्मण वेरुळकर हे अत्यंत चाणाक्ष, हुशार व देशाप्रेमाने ओतप्रोत असल्याचे त्यांचे वर्गमित्र सेवानिवृत्त केंद्रप्रमुख एल. जे. वानखेडे सर यांनी क्रांतीसुर्य न्यूज शी बोलताना सांगितले.
वीर लक्ष्मण वेरूळकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन गावातील बरेच तरुण देश सेवेत लागले आहेत. वीर हुतात्मा लक्ष्मण वेरूळकर यांचे बलिदान हे गोंधनापूर गावासाठी भूषणावह असून लवकरच गावातील जिल्हा परिषद हायस्कूलला त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांचे चुलत बंधू तर या गावचे सरपंच मधुकरराव वेरुळकर यांनी सांगितले. [ads3]
तेव्हापासून आजतागायत 9 डिसेंबर हा दिवस गोंधनापूर गावांमध्ये वीर लक्ष्मण वेरूळकर हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी केंद्रीय प्राथमिक शाळा येथे मुख्याध्यापक नरेंद्र वानखडे सर, संतोष खाडे सर, सौ.मनवार मॅडम, चव्हाण मॅडम तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत तर जिल्हा परिषद हायस्कूल येथे मिसाळ सर, वाघमारे सर, कुलकर्णी सर, राहणे सर, व विद्यार्थ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हुतात्मा दिन साजरा करत त्यांना आदरांजली वाहिली. [ads4]
ग्रामपंचायत गोंधनापूर येथे आदरांजली कार्यक्रम संपन्न
त्याचप्रमाणे ग्रामपंचायत गोंधनापूर येथेही मोठ्या प्रमाणात आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात त्यांच्या शौर्याच्या, देशप्रेमाच्या, बलिदानाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमात माजी सैनिक वसंतराव बोचरे, माजी सैनिक सुखदेव तायडे, सरपंच मधुकरराव वेरूळकर, सेवानिवृत्त केंद्र एल.जे. वानखडे सर, रविभाऊ राखोंडे, राजूभाऊ सुलताने, राजू पाटील, दामोदर निमकर्डे, गोविंदा खंडारे, विशाल निमकर्डे, लक्ष्मण निमकर्डे, महेश राजनकर, नारायण वानखडे, लक्ष्मण बनगर, गणेश निमकर्डे, गणेश वेरुळकर, योगेश निमकर्डे, विशाल वेरुळकर, नितीन राऊत, प्रशांत केनेकर, विठ्ठल गजगाणे, विठ्ठल वावगे इत्यादी सह ग्रामस्थांनी उपस्थिती लावत आदरांजली वाहिली.