लोकशाही टिकली तरच आपण सगळे टिकू-जेष्ठ विचारवंत, लेखक रावसाहेब कसबे यांचे प्रतिपादन
अ.भा. महात्मा फुले समता परिषदेच्या प्रबोधन शिबिराला मोठा प्रतिसाद
लातूर- दि.16 | देशाची राज्यघटना टिकली तर लोकशाही टिकेल आणि लोकशाही टिकली तर आपण सगळे टिकू, त्यामुळे राज्यघटना वाचवण्यासाठी आपण सर्वांनी पुढे आले पाहिजे. शिवाय महापुरुषांच्या चरणी आपले स्वातंत्र्य ठेवण्यापेक्षा त्यांच्या विचारांची अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच जागृत होवून आपला इतिहास तपासायला हवा. असे विचार ज्येष्ठ विचारवंत, लेखक ‘झोत’कार रावसाहेब कसबे यांनी आज १४ नोव्हेंबर रोजी मांडले. ते अ. भा.महात्मा फुले समता परिषद, लातूर आयोजित दयानंद सभागृहातील प्रबोधन शिबिरात ते बोलत होते.
या प्रबोधन शिबिराचे आयोजन महात्मा फुले समता परिषदेचे प्रमुख तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, पद्माकर वाघमारे व बालाजी खूने आणि कार्यकर्ते, पदाधिकार्यांनी केले होते. या प्रबोधन शिबिरात रावसाहेब कसबे यांच्याशिवाय ज्येष्ठ संपादक, लेखक उत्तम कांबळे व हरी नरके यांची प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थिती होती.
रावसाहेब कसबे पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहून एक नवा इतिहास घडवला. सामाजिक समता, सामाजिक न्याय, बंधुता, एकात्मता दिली. तुम्ही गमावलेला आत्मविश्वास परत मिळावा यासाठी आम्ही फिरतो आहोत, असेही रावसाहेब कसबे यांनी सांगितले. कसबे यांनी आपल्या व्याख्यानात भारतीय राज्यघटनेचे महत्व विशद करून महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्याची महती सांगितली. या देशातील स्त्रियांना मताचा अधिकार देणारा स्त्रियांना पहिला भाऊ बाबासाहेबांच्या रुपाने भेटल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिबिराच्या दुसर्या सत्रात जेष्ठ विचारवंत, लेखक प्रा. हरी नरके म्हणाले, आरएसएसचा अजेंडा आहे की, भारत आरक्षणमुक्त करण्याचा. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण व त्यांचा निधी पळवण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकारने केला आहे. हा घटनाद्रोह त्यांनी केला आहे. इम्पेरिकल डाटा केंद्र सरकार सदोषतेचे कारण पुढे करून देत नाही. याचाच अर्थ केंद्रातील भाजप सरकारला ओबीसीला आरक्षण मिळू द्यायचे नाही. मात्र ते कोर्टाच्या माध्यमातून झाले असे दाखवायचे, आरएसएस, भाजपवाले ढोंगी, खोटारडे असल्याचा घणाघाती आरोप प्रा. हरी नरके यांनी यावेळी केला.
तसेच येत्या काळात समग्र आरक्षणावर धोंडा येण्याची शक्यता आहे. रात्री आणि दिवस देखील वैर्याचा आहे. सावध राहा, आरक्षण समजून घ्या, जागे व्हा असे आवाहन करीत आरक्षण म्हणजे काय, तर आरक्षण म्हणजे आपला न्याय हक्काचा हिस्सा मागणे होय. असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक, लेखक उत्तम कांबळे यांनी यांनी बोलताना केले. न्याय आणि सामाजिक न्याय यामध्ये मोठा फरक असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकार काय त्यांच्या बापाचे आपणास काहीच देत नाही, ते आपल्याच करामधून आपणास देत असते, या देशात जे काही आहे, ते तुम्हा आम्हा सगळ्यांच्या हक्काचे आहे. त्यामुळे आपणास राष्ट्रीय संपत्तीचा हिस्सा मागणे अगदी रास्त आहे. असे सांगितले.
महात्मा फुले समता परिषदेच्या या प्रबोधन शिबिराला लातूर शहरातील बुद्धिजिवी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाने लातूरकरांच्या मेंदूला चांगला वैचारिक खुराक मिळाला.