भारताची धार्मिक राष्ट्रांकडे वाटचाल – प्यू रिसर्च सर्वे
प्यु रिसर्च सेंटर तर्फे जगभरातील धार्मिक,सामाजिक आणि राजकीय बदल यांचा जनमानसावर होणारा परिणाम शोधला जातो. भारतात नोव्हे २०१९ ते मार्च २०२० या काळात राष्ट्रीय स्तरावर हा सर्व्हे करण्यात आला. त्यासाठी हजारो व्यक्तींचा सखोल अभ्यास करण्यात आला.
या अभ्यासानुसार भारतीय लोक मोठ्या प्रमाणात धर्मपरायण आहेत. ७७% हिंदू कर्मावर विश्वास ठेवतात. ८१% हिंदू गंगेच्या पाण्याला पवित्र मानतात. ९७% भारतीयांचा देवावर विश्वास आहे. यात शिक्षित, निरक्षर, शहरी, ग्रामीण यांचे प्रमाण एकसारखेच आहे. शंकर, हनुमान व गणपती हे सर्वाधिक लोकप्रिय देव आहेत. ८६%हिंदू व ८८% मुस्लिम स्वधर्मियांशीच मैत्री करतात. हिंदू व मुस्लिम दोघांनाही आंतर धर्मीय व आंतरजातीय विवाह मान्य नाहीत. विशेषत: भाजपचे मतदार असलेले सर्व लोक असे मानतात. ७७% हिन्दू व मुस्लिम अंधश्रद्धाळू आहेत. फक्त १३ ते २०% लोकांनाच अनु जाती,जमाती व ओबीसी बाबत भेदभाव होतो असे वाटते. अगदी अनु जातीतील अवघ्या २६% तर ओबीसीतील १३% नाच आपल्यावर अन्याय, पक्षपात वा भेदभाव जाणवतो. बेरोजगारी,भूक यापेक्षा धर्मभावना मोठी असे मानणारे बहुसंख्य आहेत.
हा अहवाल सांगतो की, भारत झपाट्याने धार्मिक राष्ट्रांकडे वाटचाल करीत आहे. मित्रहो, परिवर्तनाचे काम किती कठीण आहे. याचा विचार करा आणि अशा लोकांना दुखवणाऱ्या कडवट भाषेतील पोस्ट टाळा. लोकांपासून फटकून राहून नव्हे तर त्यांच्यासोबत राहूनच आपल्याला परिवर्तन घडवावे लागेल याचे भान ठेवा. (संदर्भासाठी पहा: बापू राऊत, सुगावा,सप्टेंबर २०२१,पृ.८/९)
प्रा.हरी नरके