सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नामांतराचा इतिहास – प्रा. हरी नरके

९ ऑगस्ट २०१४ रोजी पुणे विद्यापीठाचे नामांतर झाले. “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे” होताना एका मोठ्या घुसळण प्रक्रियेतून जावे लागले. श्री. विश्वंभर चौधरी यांनी लोकसत्तामध्ये मोठ्ठा लेख लिहून या नामांतराला विरोध केला होता. त्यावर ” सावित्रीला नकार, गर्जे विश्वंभर” असा रोखठोक प्रतिवाद मी केला होता. जनमताचा प्रचंड रेटा आणि श्री. छगन भुजबळ यांचा मंत्रीमंडळातील पाठपुरावा यामुळे हे ऐतिहासिक नामांतर होऊ शकले.[ads1]
इ.स.१८४८ मध्ये पुण्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई व जोतीरावांनी भिडे वाड्यात देशातली पहिली मुलींची भारतीय शाळा काढली.या कामात अल्पसंख्यक, दलित, बहुजन, उच्चजातीय सारेच होते. त्यावेळी भारतात फक्त २.५% साक्षरता होती. आज ती देशात ८०% आणि महाराष्ट्रात ९०% वर गेलीय.
१०० वर्षांनी १९४८ ला पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाला सावित्रीबाईंचे नाव देण्याची कल्पना मी सर्वप्रथम मांडली तेव्हा तिला पाठींबा देणारे पहिले होते, (१) ना. छगन भुजबळ, (२)विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाचे डीन आणि विद्यमान प्रकुलगुरू डॉ. संजीव सोनावणे, (३) दि. कृष्णकांत कुदळे, (४) मित्रवर्य Sanjay Sonawani – संजय सोनवणी, (५) विद्यापीठाचे कुलगुरू गाडेसर आणि प्रा. गौतम बेंगाळे. नंतर अनेक जण पाठिंब्यासाठी पुढे आले. आता तर त्यावेळचे विरोधक चंगू मंगू सुद्धा श्रेय घ्यायला पुढे सरसावतात.चालायचेच.
विरोधक खूप होते. चौधरी यांचे भाईबंद, सनातनी, सर्वपक्षीय राजकारणी आणि हितसंबंधी. असे बरेच. मग भूमिगत प्रयत्न नी बांधणी चालू ठेवल्यावर सारे विरोधक गारद झाले नी ८ वर्षांपुर्वी अखेर नामकरण झाले.
डॉ. सोनवणेसरांनी ज्या प्रकारे मुत्सददीपणाने रचना केली नी भुजबळसाहेबांनी मंत्रीमंडळात हा विषय लावून धरून लॉबिंग केले त्याला तोड नाही. तिन्ही प्रस्थापित लॉब्या विरोधात असताना पडद्यामागे नेमके काय घडले यावर पुराव्यानिशी तपशीलवारपणे लिहिनच. अनेक प्राध्यापक, सिनेट व व्यवस्थापन सदस्य, लढाऊ नागरिक यांच्या सक्रिय पाठिंब्यामुळेच हे विद्यापिठ नामांतर शक्य झाले.
त्या सर्वांना मन:पुर्वक धन्यवाद.