साहित्यकट्टा

कथा संघर्षाची – काळोखातली प्रकाशवाट – काशिनाथ महाजन नाशिक

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात पातोंडे गाव आहे, तेथे देवराम महाजन हे अतिशय गरीब मिल मजूर राहत होते. नऊ जणांचे कुटुंब चालवणे त्यांना अतिशय अवघड जात होते. मी त्यांचा मुलगा म्हणजे काशिनाथ देवराम महाजन. माझे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले. हुशार मुलगा म्हणून शाळेत व घरी माझे कौतुक व्हायचे.

इयत्ता चौथीत असतांना शासकिय विद्यानिकेतन साठी स्पर्धा परीक्षा नव्यानेच सुरू झाली होती. ह्या परीक्षेचे वैशिष्ट्य असे कि त्यात उत्तीर्ण झालेल्या मुलांपैकी सहा-सात जिल्ह्यातून फक्त तीसच मुलांची निवड केली जात असे. त्यांना शासकीय विद्यानिकेतनात प्रवेश मिळायचा. अशी विद्यानिकेतने महाराष्ट्रात फक्त चारच होती. माझा जळगाव जिल्हा तत्कालीन मुंबई विभागात असल्याने या विभागासाठी नाशिक येथे शासकीय विद्यानिकेतन होते. या परीक्षेत उत्तम गुण मिळाल्याने मला नाशिकच्या विद्यानिकेतनात प्रवेश मिळाला. शाळेतील शिक्षण, निवास, भोजन उच्च प्रतीचे होते. कला ,क्रीडा, संगीत व विविध छंद आत्मसात करण्यास येथे वाव होता.

शासकीय विद्यानिकेतनात आपल्या मुलाला प्रवेश मिळाला याबद्दल देवराम महाजन यांना फारच आनंद झाला होता.गावात व आजूबाजूच्या परिसरात माझा व वडिलांचा सत्कार करण्यात आला होता. मी नव्या शाळेत खूपच उत्साहाने अभ्यास करू लागलो. मला इयत्ता सहावीत असतांनाच पहिली कविता सुचली. तिच्या २ ओळी प्रस्तुत करत आहे.

त्रिवार वंदन माझे, मधुकरराव चौधरींना
दगडांमधले रत्न शोधले ,त्या रत्नपारखींना

ती वाचून शाळेतील अध्यापकांना व प्राचार्यांना खूपच आनंद झाला. नियतीला मात्र माझे वैभव पाहवले नाही. माझी नजर हळूहळू कमी होऊ लागली. वयाच्या बाराव्या वर्षी मला लिहिणे वाचणे अशक्य झाले. तरीही प्राचार्यांनी माझे नाव शाळेतून कमी केले नाही. मुलांनी व अध्यापकांनी मला सहकार्य करावे असे त्यांनी सुचवले. वाचक व लेखनिकाच्या मदतीने माझे शिक्षण सुरू राहीले.

माझे वडील मात्र मुलगा अंध झाल्यामुळे फारच खचून गेले. त्यातच ते जिथे काम करत होते ती मील बंद पडली. कमाईचे काहीच साधन राहीले नाही. त्यांच्या जीवाची खूपच घालमेल झाली. मी नववीत असतांनाच त्यांचे दुःखद निधन झाले. संसार उघडा पडला. तरी आईने धीर सोडला नाही. शेतमजुरी करून ती कसेबसे दोन घास मुलांच्या मुखी घालू लागली. मी अंध झालो तरीही कविता करणे सोडले नाही. जो निसर्ग मनात साठला होता त्या आधारे निसर्ग कविता करणे सुरूच होते. त्याबरोबरच देशभक्तिपर, वैचारिक व सामाजिक कविताही करू लागलो. शाळेतील साप्ताहिकात व वार्षिक विशेष अंकात माझ्या कवितांना मानाचे पान मिळू लागले. मी मनाशी ठरवले कि –
जीवनात आला अंधार
तरी सोडणार नाही निर्धार
कविताच देतील मला आधार
आणि दिव्य प्रेरणांचा साक्षात्कार[ads1]

अध्यापक आणि मित्रांच्या सहकार्यामुळे तसेच प्राचार्यांच्या माझ्यावरील कृपादृष्टी मुळे माझे अंधत्व मला फारसे त्रासदायक वाटले नाही. अभ्यास उत्तरोत्तर उत्तम होत गेला. त्यामुळेच तत्कालीन अकरावी म्हणजेच मॅट्रिक च्या परिक्षेत मला नेत्रदीपक यश मिळाले. २४ जून १९७३ च्या ‘साप्ताहिक गावकरी’ या नाशिकच्या वर्तमानपत्रात ‘अधुरी ही कहाणी’ या शीर्षकाखाली माझ्या विषयी प्रदीर्घ लेख प्रकाशित झाला.

शासकीय विद्यानिकेतनाची सुविधा ११ वी पर्यंतच असल्याने मला गावी परत यावे लागले. दुर्दैवाची गोष्ट अशी कि ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणीप्रमाणे १९७१ ते १९७३ अशी सलग तीन वर्षे भारतात भीषण दुष्काळ पडला होता. शेते ओसाड पडली होती. भारतातील अन्नसाठा संपला होता. अमेरिकेतून निकृष्ठ प्रकारची लाल ज्वारी आणि मका आयात करण्यात आला होता. जनतेच्या पोटाची जेमतेम व्यवस्था झाली होती. रोजगारासाठी पाझर तलावांचे खोदकाम सरकारने सुरू केले होते. मी अंध असूनही आईबरोबर पाझर तलावाच्या कामांना जात असे. मजूरी फक्त आठ आणे मिळायची. अनेकदा ठेच लागून पडायचो; पण तसाच उठायचो.[ads2]

मला पुढे शिकायचे होते. गावापासून आठ किलोमीटर अंतर असलेल्या चाळीसगाव कॉलेजात प्रवेश मिळण्यासाठी मी धडपड सुरू केली. या कामात माझ्या काकांनी मला मदत केली. आजपावेतो त्या कॉलेजात कुणीही अंध शिकला नव्हता. अनेकदा विनंत्या करूनही तिथे प्रवेश मिळत नव्हता. मी मात्र प्रयत्न करणे सोडले नाही. अखेर प्रवेश मिळाला. कॉलेजला जाण्यासाठी गाडी भाडे देणे मला शक्य नव्हते. त्यामुळे मी रोज ८ किलोमीटर पायीच जाऊ लागलो. दरम्यानच्या काळात चाळीसगावच्या अंध शाळेत ब्रेल लिपीचे शिक्षण घेतले. त्यामुळे मला कॉलेजच्या नोट्स काढता येऊ लागल्या. खूप अभ्यास करू लागलो. १९७७ साली राज्यशास्त्र विषयात बी.ए . उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालो. त्या काळात अंधांना नोकरी मिळणे अवघड होते. मला कळले की पुण्याला अंधांसाठी एक शेल्टर वर्कशॉप आहे, तेथे अंध लोक खुर्च्या विणतात, खडू तयार करतात, त्यासाठी तेथे प्रशिक्षणाची सोय आहे, भोजन व निवास मोफत आहे, शिक्षणाची अट नाही. मी बी ए उत्तीर्ण असूनसुद्धा त्या वर्कशॉप मध्ये प्रवेश घेतला.

१९७८ साली महाराष्ट्र शासनाने पदवीधर अंधांसाठी एक योजना सुरू केली होती. महाराष्ट्रातून दरवर्षी एका पदवीधर अंधास अंध शिक्षक प्रशिक्षणासाठी निवड पद्धतीने प्रवेश मिळणार होता. त्यावेळेस भारतात फक्त चारच प्रशिक्षण केंद्रे होती. गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश या तीन राज्यांसाठी मुंबई येथे प्रशिक्षण केंद्र होते. १९७८ साली अंध शिक्षक प्रशिक्षणासाठी माझी निवड झाली. या प्रशिक्षणात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे तत्कालीन गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या शुभहस्ते मला ‘ मृणालिनी पिंगळे अॅवॉर्ड’ देण्यात आले.[ads3]

१९७९ साली शासकीय बहुउद्देशीय संमिश्र केंद्र सोलापूर येथे माझी विशेष शिक्षक पदावर नियुक्ती झाली. माझे काव्यलेखन अखंड चालूच होते. अनेक ब्रेल व डोळस वर्तमानपत्रे, मासिके यातून माझ्या कविता प्रकाशित होत होत्या. त्या शाळेतील अंध मूकबधिर व अपंग मुलांना पाहून माझ्या मनात आले कि यांच्या जीवनात नवे चैतन्य निर्माण करावे. त्यासाठी छान छान गाणी रचावी. त्यांना सहज सोपी चाल लावावी. मुलांना माझी गाणी आवडली. ‘नाते प्रगतीशी’ या माझ्या कवितेने सोलापूरमध्ये क्रांती घडवली.तिच्या दोन ओळी प्रस्तुत करत आहे.
विज्ञानाची संगत आम्हा,हेलन केलर पाठीशी
मनामनाला पटवून देऊ,नाते आमचे प्रगतीशी

अनेकवर्तमानपत्रांनी या कविते विषयी लेख लिहिले. सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी रत्नाकर गायकवाड यांनी या कवितेचे कौतुक केले. १९८१ हे साल जागतिक अपंग वर्ष म्हणून जाहीर झाले होते. गायकवाड साहेबांनी त्यानिमित्त अनेक उपक्रमात मला सहभागी करून घेतले होते. तत्कालीन शिक्षक आमदार प्रकाश एलगुलवार यांनी माझ्या सहकार्याने सोलापूर येथे राष्ट्रीय अंधजन मंडळाची जिल्हा शाखा स्थापन करून माझी नियुक्ती सरचिटणीस पदावर केली.[ads4]

अंध व्यक्तीचा विवाह होणे हे त्या काळात जवळजवळ अशक्य होते. अंधही शासकीय नोकरी करतो हे कुणीही मान्य करत नव्हते. फार खटपट केल्यानंतर मामाच्या मुलीशी माझा विवाह झाला. १९८६ साली माझी बदली पुणे येथे झाली. पुणे येथे असतांनाच लोणावळा येथील ‘कैवल्यधाम’ या आंतरराष्ट्रीय, इंग्रजी माध्यमाच्या योग शिक्षक प्रशिक्षण केंद्रात मला प्रशिक्षण घेण्याचा योग आला. अनेक देशांतील डोळस प्रशिक्षणार्थी असतांनाही मी तेथे उत्तम प्राविण्य संपादन केले. पुणे येथे असतांनाच समाजशास्त्र विषयात प्रथम श्रेणीत एम्. ए. उत्तीर्ण झालो. पुणे महानगर पालिकेने आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मला प्रदान केला.

१९९९ साली नाशिक येथील शासकीय अंध शाळेत माझी बदली झाली. येथील मुलांना संगीत शिकवले जात होते. माझ्या गीतांना संगीताची साथ मिळू लागली. त्यामुळे माझी नवनवीन देशभक्तीपर व सामाजिक गीते नावारूपाला आली. सौ. शारदा गायकवाड या स्वाध्यायी समाजसेविकेच्या पुढाकारामुळे ‘ज्योतीकलश’ हा माझा पहिला काव्यसंग्रह २००२ साली व ‘ चैतन्यचक्षू’ हा दुसरा काव्यसंग्रह २००४ साली प्रकाशित झाला. नाशिक जिल्हा परिषदेने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन माझा गौरव केला. समाजकल्याण खात्याच्या नाशिक विभागीय कार्यालयाने ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ मला दिला. राष्ट्रीय अंधजन मंडळाच्या महाराष्ट्र राज्य शाखेने ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक’ पुरस्कार मला प्रदान केला. याच काळात स्वाध्याय प्रणित तत्वज्ञान विद्यापीठाच्या चार परीक्षा मी उत्तीर्ण झालो. त्यातील ‘ विचक्षण’ परीक्षेत मला जागतिक मेरीट प्राप्त झाले.[ads5]

माझ्या जीवनात अभूतपूर्व असा योग चालून आला. आजवर कुठल्याही शासकीय अंध शाळेतील अंध शिक्षकाला अधिक्षकाचे पद प्राप्त झालेले नव्हते. परंतु मला ते मिळाले. शासकीय अंध शाळा कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे अधिक्षक पदावर मी रूजू झालो. त्या काळात कोकणातील कोकण मराठी साहित्य परिषदेशी मी जोडला गेलो. या परिषदेतील वृंदा कांबळी यांनी माझ्या निवडक १८ कवितांच्या आधारे ‘सहा टिंबातून’ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला. त्याबाबतची संकल्पना अशी की जिल्ह्यातील निवडक प्राध्यापक, गायक, आकाशवाणी निवेदक अशा सहा व्यक्तींना प्रत्येकी तीन कविता गायन किंवा वाचन करण्यास दिल्या. त्यासाठी योग्य असा निवेदन पट तयार केला. अनेक तालुक्यातून हा कार्यक्रम सादर झाला. रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अधिक्षक पदाची कारकिर्द यशस्वी रित्या पार पाडून २०१४ साली मी सेवानिवृत्त झालो.

सेवानिवृत्तीनंतर काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडतो परंतु मला तो पडला नाही. नाशिक ही कवी लेखक नाटककार यांची साहित्य पंढरी आहे. या साहित्यिक मेळ्यात मी स्वतःला झोकून दिले. खऱ्या अर्थाने माझ्या कवितांना जनाधार प्राप्त झाला.माझे अंधत्व गौण मानून माझ्या प्रतिभेचा आदर केला गेला. अनेक कविमंडळे नाशिकमध्ये आहेत. दर आठवड्याला कुठे ना कुठे कविसंमेलन होतेच. त्यात सहभाग घेऊ लागलो. २०१६ साली ‘दृष्टीपल्याड’ हा माझा तिसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. विशेष म्हणजे मी ज्या शासकीय विद्यानिकेतनात शिक्षण घेतले होते त्यातील माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.[ads1]

अनेकांच्या आग्रहाखातर ‘काळोखातली प्रकाशवाट’ हे माझे आत्मचरित्र २०१७ साली भव्य समारंभात प्रकाशित झाले. हा भव्य समारंभ म्हणजे शासकीय विद्यानिकेतनाचा सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिन होता. संपुर्ण महाराष्ट्रातील नामवंत व्यक्ती या कार्यक्रमास हजर होते. इस्कॉन या आंतरराष्ट्रीय संस्थेने भगवत गीतेवर आधारित ‘गीताप्रज्ञा’ ही स्पर्धा परीक्षा आयोजित केली होती. या परिक्षेत ९४% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त झाल्यामुळे डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या शुभहस्ते मला रू १५००० चा पुरस्कार एका भव्य समारंभात प्राप्त झाला. सेवा निवृत्तीनंतरचा काळ अधिक सुखाचा व अधिक कार्यमग्न होण्यासाठी बोलका कॉम्प्युटर व बोलका मोबाईल हाताळण्याची कला मी अवगत केली. अनेक साहित्यिक व्हाट्सऍप गृपवर माझ्या कविता प्रसारित होऊ लागल्या. १० व ११ जून २०१७ रोजी जळगाव येथे राज्यस्तरीय अंध अपंग साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मला मिळाला तसेच २०१७ साली लिमका बुक रेकॉर्ड्स साठी सलग २४ तास कविसंमेलन पुणे येथे माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.[ads2]

राज्यभरात अनेकदा अंध अपंगांच्या कविसंमेलनाचे अध्यक्षपद मी भूषविले.तसेच डोळस कवींच्या अनेक संमेलनात माझ्या कवितांना तसेच काव्यसंग्रहांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.ऑनलाइन काव्यस्पर्धेत वारंवार पुरस्कार प्राप्त होत आहेत.गझल या काव्यप्रकारातही माझी यशस्वी वाटचाल चालू आहे.
माझ्या मराठी व अहिराणी कविता वृत्तबद्ध व छंदोबद्ध असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून अनेकजण त्या कवितांचे गायन करून ऑडिओ पाठवतात. काही यूट्यूब चानलवर त्या गायनाचे व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात. डिसेंबर २०२१ मध्ये नाशिक येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दूरदृष्टी या माझ्या चौथ्या काव्यसंग्रहाचे व काळोखातली प्रकाशवाट या आत्मचरित्राच्या विस्तारीत आवृत्तीचे प्रकाशन झाले.

अशाप्रकारे माझा यशस्वी जीवनप्रवास चालूच आहे. अंधत्वाबद्दल मी कधीही देवाला दोष दिला नाही कारण सर्वसामान्य माणसाप्रमाणेच मी आयुष्य जगलो. माझा मुलगा उत्तम प्राथमिक शिक्षक असून मुलीचे एलएलबी झाले असून तिचे पती भारतीय लष्करात ‘मेजर’ पदावर आहेत. चार नातवंडांसह आमचे परिवार सुखी आहेत. कथा संपावायच्या आधी मला प्रामाणिकपणे कबूल करावेच लागेल की माझ्या जीवन प्रवासात माझी पत्नी सौ. रेखा हीने अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. शेवटी जाता जाता एक स्वरचित कविता सादर करत आहे.[ads3]

चैतन्य-चक्षु
वृत्त आनंदकंद

चैतन्य-चक्षु अपुले, जागे सदैव ठेवू
अंधत्व भेदुनी हे, जगणे सतेज ठेवू

शिखरास उंच पाहू, पंखात जिद्द ठेवू
ध्येयास गाठण्याला, उत्तुंग झेप घेऊ
नैराश्य टाळण्याला, गाणे मधूर गाऊ
अंधत्व भेदुनी हे, जगणे सतेज ठेवू

सृष्टी दिसे न काही, मज मान्य न्यूनता ही
दैवास दोश द्यावा, ऐसे न यात काही
जन्मास पाहण्याची, दृष्टी सकार ठेवू
अंधत्व भेदुनी हे, जगणे सतेज ठेवू

नेत्रांध हो कुणी हा, प्रारब्ध जीवनाचा
स्वार्थांध वासनाधिन, हा दोष मानवाचा
टाळून या विकारा, गुणवान सर्व होऊ
अंधत्व भेदुनी हे, जगणे सतेज ठेवू

काही असे करू की, दिपवू अखील विश्व
म्हणतील अंध असुनी, झाला प्रकाश-पर्व
अंधार आवसेचा, दीपावलीत भुषवू
अंधत्व भेदुनी हे, जगणे सतेज ठेवू[author title=”काशीनाथ महाजन- नाशिक” image=”https://krantisuryanews.in/wp-content/uploads/2022/06/IMG-20220615-WA0007.jpg”]लेखक, कवी, साहित्यिक – ९८६०३४३०१९[/author]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button