वैचारीक लेख

8 मार्च जागतिक महिला दिन म्हणजे स्त्री स्वातंत्र्याचा गौरव होय

अनाधी काळापासून स्त्रियांना दुय्यम लेखण्याची परंपरा होती, काही प्रमाणात ती आजही पहायला मिळते. केवळ भारतातच नव्हे तर जवळ जवळ संपूर्ण जगातच स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन हा दुय्यम दर्जाचाच होता. अगदी शिक्षणाच्या बाबतीत हि काही देशात स्त्रियांना वंचित रहावे लागले आहे. त्या मध्ये भारताचे नाव हे अग्रकमाने येते. भारतात हि स्त्री शिक्षणाची हेळसांड झालेली आपल्याला पहायला मिळते. स्त्रियांना केवळ शिक्षण घेण्याचीच बंदी नव्हती तर, घराच्या बाहेर पडणे, कोणत्याही व्यवहारात सहभाग घेणे शक्य नव्हते.

एकंदरीत पुरुष स्वातंत्र्याच्या बाबतीत विचार केला तर स्त्री स्वातंत्र्याचे जवळ जवळ सर्व अधिकार हिरावून घेण्यात आले होते.स्त्रियांचे जिवन म्हणजे केवळ आणि केवळ गुलामी, अज्ञान, अन्याय अत्याचार यातच किचपत पडलेले होते. स्त्रियांचे दुःख, त्यांच्या व्यथा समजून घेण्याची समाजाची मानसिकता तयार झालेली नव्हती. परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्या ठिकाणी क्रांती जन्माला येत असते.महिलांवरील होणाऱ्या अन्यायाच्या अतिरेकातुन भारतात सर्व प्रथम सतीची चाल याविरुद्ध आवाज उठवला गेला, अनेक समाज सुधारक, क्रांतिकारी यांनी सती प्रथे विरुद्ध जनजागृती केली. आणि सती प्रथा बंद केली.

बाल विवाहाचे देखील प्रमाण त्या काळात जास्त होते. बाल जरठ विवाह म्हणजे बाल मुलीचा विवाह वयस्कर व्यक्तीशी करणे. अश्या विवाहामुळे मुलींचं विधवा होण्याचं प्रमाण वाढत असे, विधवा झालेल्या महिलांना अनेक समस्यांना व अनेक संकटाना सामोरे जावे लागत असे. अश्या प्रथांना विरोध करून स्त्री उद्धाराचे कार्य करण्याचे काम जसे महापुरुषांनी केले तसेच स्त्रियांनी सुद्धा केले त्यातलच एक नाव म्हणजे सावित्रीमाई फुले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात देखील स्त्रियांचा मानसन्मान केला जात असे, स्त्रियांवर अन्याय करणाऱ्याला योग्य ती शिक्षा शिवरायांच्या स्वराज्यात होती.

अश्या प्रकारचे स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा देखील एका स्त्रीचीच होती आणि ती स्त्री म्हणजे माँ साहेब जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आदर्श घेऊन एका स्त्री ने स्वतः च्या कर्तृत्वाने राज्य निर्माण करून रयतेला न्याय देण्याचं कामं केलं होतं ती योद्धा स्त्री म्हणजे राजमाता अहिल्यामाई होळकर. इतिहासाने दखल घेऊन स्त्रियांचे शौर्य, त्यांचं कार्य, त्यांचं तत्वज्ञान जगासमोर मांडलं आहे. त्याच स्त्रियांचा गौरव म्हणून जगभरात साजरा होणारा दिवस म्हणजे 8 मार्च. तत्कालीन कालखंडात स्त्रियांवर लादले गेलेले बंधन,त्यांच्या समस्या किंवा एकंदरीत स्त्रियांना दिली जात असलेली वागणूक वाचून किंवा ऐकून आपल्या मनात नक्कीच त्या व्यवस्थेविरुद्ध चीड आल्याशिवाय राहणार नाही. जी बाब आपण ऐकल्यावर आपल्याला वाईट वाटतं त्या परिस्थितीचा सामना करत असताना स्त्रियांना काय वाटत असेल याचा जर आपण विचार केला तर खरोखरच आपल्याला 8 मार्च जागतिक महिला दिनाच महत्व कळेल.

8 मार्च जागतिक महिला दिनाच्या माध्यमातून जगभरातील नामांकित स्त्रियांच्या तत्वज्ञानाचा, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या शौर्याचा काही प्रमाणात का होईना गौरव होतो. क्रांतिकारी स्त्रियांमुळे मुलींना हि क्रांतीची प्रेरणा मिळते, अन्याय अत्याचाराचाच्या विरोधात कार्य करण्याची इच्छा निर्माण होते. म्हणून हा दिवस आपण सर्वांनी साजरा करायला हवा, स्त्रियांचे शौर्य, कार्य समाजासमोर मांडायला हवे.

असे कोणतेच क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रात स्त्रियांनी आपलं योगदान दिलेल नाही. प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांच महत्वाच योगदान आहे.समाज सुधारणे पासून ते समाज घडवण्यापर्यंत स्त्रियांचे महत्व पूर्ण योगदान आहे. माँ साहेब जिजाऊ, माता अहिल्यामाई, माता सावित्रीमाई, माता रमाई, स्त्री – पुरुष समतेच्या नेत्या ताराबाई शिंदे, माता फातेमा शेख, मुक्ता साळवे. अश्या अनेक स्त्रियांनी समाजासाठी देशासाठी खूप मोठं योगदान दिलेल आहे. संत परंपरेमध्ये सुद्धा अनेक स्त्रियांनी आपलं योगदान दिलेले आहे.समाजामध्ये असलेल्या कुप्रथांमुळे व पुरुष सत्ताक संस्कृतीमुळे स्त्री जीवनाची झालेली दशा जर आपण पाहिली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जर या महान स्त्री क्रांतिकारक होऊन गेल्या नसत्या तर आजही स्त्रियांची पाहिजे तेवढी प्रगती झालेली दिसली नसती.[ads1]

महात्मा फुले म्हणतात स्त्री शिकली तर कुटुंब शिकत कुटूंब शिकलं तर देश शिकेल म्हणजे स्त्री शिक्षणामुळे कुटूंबाला आणि देशाला फायदा होतो असा विचार महात्मा फुले मांडतात यातून स्त्रीयांनी शिक्षण घेणे हे किती महत्वाचे आहे हे लक्षात येते. आज ही काही संकोचीत विचारांचे लोक मुलींना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षण घेऊ देत नाहीत. मुलीच्या इच्छे विरुद्ध जाऊन तीच शिक्षण बंद करून तीच लग्न लावून देण्याचे काम अजूनही समाजात मोठ्या प्रमाणात चालू आहे. एकीकडे महिला दिन साजरा करायचा आणि दुसरीकडे मुलींना त्यांच्या इच्छे प्रमाणे शिक्षण घेण्यास विरोध करायचा अशी काहीसी मानसिकता समाजाची पहायला मिळते. ही मानसिकता कुठेतरी बदलणे गरजेचे आहे. जो पर्यंत स्त्रीयांच्या बाबतीत समाजाची मानसिकता पूर्णपणे बदलत नाही तो पर्यंत खऱ्या अर्थाने समाज प्रगत होणार नाही.[author title=”परमेश्वर बनकर” image=”https://krantisuryanews.in/wp-content/uploads/2023/02/parmeshwar-bankar.jpg”] विचारवंत, लेखक, व्याख्याता +919503288282 [/author]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button