सहज जलबोधकार उपेंद्रदादा धोंडे यांचे पदम् पुरस्कारासाठी नामांकन
एक सरकारी अधिकारी म्हणून आणि खास करून एका भूवैज्ञानिकाचे पदम् पूरस्काराकरिता नामांकन हे जरासं वेगळंच ना? पण होय, हे घडतंय. उपेंद्रदादा धोंडे यांनी पुण्यात २२ मार्च २०१५ रोजी एका जलसाक्षरता कार्यक्रमात सहज जलबोध अभियानाची मुहूर्तमेढ रोवलेली. त्यांच्या आजवरच्या ज्या कार्यामुळे मराठीतून भूजल विज्ञान शिकवणारे “सहज जलबोधकार” अशी ओळख त्यांना मिळाली आहे त्या जलसाक्षरता प्रसारकार्याची नेमकी आठवण रहावी आणि जलसाक्षरता प्रसाराचा हा उपक्रम आज कोणत्या अशा टप्प्यावर आहे कि ज्यामुळे २०२२ च्या पदम् पूरस्काराकरिता विविध व्यक्ती, संस्था उपेंद्रदादा धोंडे यांचे नामांकन सादर करत आहेत याची थोडीशी ओळख व्हावी आणि सहज जलबोध अभियानाचे महत्व समाजाला कळावे या उद्देशाने हा लेख.
जेव्हापासून जल/पर्यावरणक्षेत्र हे “पद-प्रसिद्धी-पूरस्कार रुपाने सामाजिक प्रतिष्ठा आणि पर्यायाने राजकीय बळ प्राप्त करण्याचा मार्ग” म्हणून दिसू लागले तेव्हापासूनच
“सगळं कसं सहज सोपं आहे, हे सांगून लोकांना भविष्याची मोठमोठी स्वप्नं दाखवायची” असा भावनेला हात घालायचा हातखंडा प्रयोग जोरदार सुरू आहे. या सूलभीकरणातून व उत्सवीकरणातून जी अंध-फालोअर्सची गर्दी जमा होते त्यालाच सामाजिक-राजकीय यश मानत अशा कामांचा उदोउदो होतोय. पण या सगळ्यातून समाजाची, पर्यावरणाची किती मोठी हानी आपण करतो आहोत याची कल्पना या खड्डेखोरांना- वृक्षखोरांना नाही, किंवा कदाचित कल्पना असूनदेखील जाणीवपूर्वक केवळ क्षुद्र स्वार्थापायी हा खेळ सुरू आहे. हा खेळ फक्त शूल्लक आर्थिक स्वार्थाकरिता, एखाद्या मंडळ/ समितीत पद मिळवण्यापुरता अथवा फार तर एखाद्या जिल्हा , राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार पूरताच, हेच यांच्या जीवनाचे साध्य.
जागोजागी भूछत्रासारख्या निर्माण झालेल्या चळवळी आणि त्यांचे प्रणेते म्हणून मिरवणारे सेलिब्रिटी समाजसेवक कधीही व्यवस्थेला पर्याय बनू शकत नाहीत. जल/पर्यावरणक्षेत्रात जोवर व्यवस्था बळकट असू शकत नाही तोवर पर्यावरणसमृद्धीचे स्वप्न हे स्वप्नंच राहील. म्हणून व्यवस्था बळकट करायची असेल तर तिला लोकसहभागातून मजबूत प्रशिक्षित मनुष्यबळाचा आधार गरजेचा आहे. ‘आपण स्वतः प्रत्यक्ष वास्तू निर्माण करायची तर मर्यादित काळात एकटेच किती वास्तू निर्माण करणार? १-२-५-१०-२०? पण जर वास्तूनिर्माणाची कला शिकवूण हजारो हात तयार केले तर? तेवढ्याच कालावधीत हजारो वास्तू निर्माण होतील, नाही का? यालाच तर तांत्रिकता प्रशिक्षण म्हणतात. सहज जलबोध अभियान हेच काम करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हजारो प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माणाचे काम.
कोणत्याही विषयातील असो पण प्रबोधक हे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देत असतात. असेच केवळ लोककल्याण हा उदात्त हेतू नजरेसमोर ठेऊन ‘सहज जलबोध अभियान’ समाजापुढे ठेवणारे उपेंद्रदादा धोंडे.
खरं तर ते एक वरिष्ठ वैज्ञानिक पदावर कार्यरत केंद्र सरकारी अधिकारी पण समाजातली शासकीय अधिकारी म्हणजे लाचखावू, कामचूकार हि प्रतिमा बदलावी यासाठी सतत आग्रही असणारे. समाजात तळागाळात निसर्गप्रेमाची भावना जागृत करुन, पंचमहाभूत परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी एखादी चळवळ असावी, असे त्यांना वाटले आणि त्यांनी सहज जलबोध अभियान सुरु केले. अगदी स्वतःच्या वेळ, पैसा आणि परिश्रमाने जवळपास गेली सात-आठ वर्षे लोकांसाठी सहज जलबोध अभियान माध्यमातून त्यांनी जलसाक्षरता प्रयत्न सुरु ठेवले आहेत.
अर्थात हे करत असताना, तांत्रिकतेचे महत्व पटवून देण्यासाठी “वर्तमान स्थितीत काय चूकीचे घडत आहे आणि त्याचे दुष्परिणाम काय” यावर बोलणेही तितकेच अपरिहार्य असते. मग यातून बिनतांत्रिक खड्डेखोरीवर, मियावाकी सारख्या गोष्टींंवर आणि त्याची भलामण करणाऱ्या व्यक्ती संस्था (मग ते शासकीय-गैरशासकीय अधिकारी, सेलिब्रिटी वा अन्य कोणीही असो) यांच्यावर परखड कोरडे ओढावेच लागतात. असं नाही केलं तर जनतेची दिशाभूल थांबणार कशी?अर्थात असे अनेक अडथळे आलेले असले तरी यासाठी उपेंद्रदादानी सोशल मीडियाचा यथार्थ उपयोग करून घेतलाय आणि सहज जलबोधरुपी ज्योत समाजप्रबोधनासाठी सतत तेवत ठेवली आहे.
आपण भलेही चार ठिकाणी काही चांगल्या जल संरचना निर्माण करून प्रसिद्ध होऊ पण ते पुरेसे नाही, “जर समाजातील तळागाळातला तरुण जलक्षेत्रात तांत्रिक परिपूर्णतेचा आग्रह धरील तरच जलसाक्षरतेला खरा अर्थ प्राप्त होईल” असे त्यांचे मत आणि यासाठी सहज जलबोध अभियान माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत सहज जलबोध अभ्यासक्रम पोचवून जलक्षेत्राविषयी सुस्पष्ट दृष्टिकोन असणारे मनुष्यबळ निर्माण यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. जल-पर्यावरणक्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची नितांत आवश्यकता आहे. यासाठी आदर्श भूजल आराखडा, त्रिस्तरीय पुनर्भरण आणि निसर्गबेट अशा संकल्पना समोर ठेवून, त्याबद्दलची इत्यंभूत तांत्रिक परिपूर्ण माहिती अभ्यासक्रम स्वरूपात उपलब्ध करून देत, अनेकांना प्रशिक्षित करून मग प्रत्यक्ष जल-पर्यावरणक्षेत्रात कार्य करण्यासाठी संपूर्ण सक्षम-सज्ज करणे हे सहज जलबोधाचे काम अथकपणे अविरतपणे चालू आहे.
सार्वजनिक जीवनात विचारमंथन करण्यासाठी सोशल मीडिया हि मोठी शक्ती आहे. तिचा उपयोग जलक्षेत्रात क्रांतिकारी बदलांसाठी होऊ शकतो याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळेच वेळोवेळी त्यांच्या लिखाणास प्रसिद्धी मिळण्यात अडचणी निर्माण केल्या गेल्या तरीदेखील त्यांनी स्वतःला “फेसबुक्या” म्हणवत लिखाण सुरू ठेवलेय आणि आपला एक मोठा वाचकवर्ग तयार केला आहे. यातील अनेक तरुण मंडळी आता सहज जलबोध अभियानाचा धडाडीने प्रचार-प्रसार करत आहेत.
शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना अत्यंत बिकट स्थितीतमध्ये हे अभियान चालविण्याचे कार्य उपेंद्रदादा करत आहेत. जलक्षेत्रातील अनेक चुकीच्या बिनतांत्रिक खड्डेखोर प्रकारांवर त्यांनी वेळोवेळी जोरदार प्रहार केले, यासाठी सहज जलबोध अभियानास त्यांनी समाज परिवर्तनाचे शास्त्र व शस्त्र म्हणून वापरले. ते स्वतः भूजल विज्ञान विषयात पारंगत आहेतच परंतु आपल्या अशा ज्ञानाचा उपयोग आपल्या समाजाला कसा होईल याकडे ईतर भूवैज्ञानिकांनीही लक्ष देणे गरजेचे आहे हे सांगण्याचा त्यांचा सततचा प्रयत्न सुरू आहे.
सोप्या आणि साध्या मराठी भाषेत सर्वांना समजेल असे लिखाण सहज जलबोध अभ्यासक्रम रूपाने त्यांनी लिहिले आहेच, त्याचबरोबर त्यांची सहज जलबोध तंत्र, आदर्श भूजल आराखडा, जलक्षेत्रातील तांत्रिकता, शहरी नद्यांचा आक्रोश, निसर्गबेट, शिवगोरक्षयोग हि पुस्तके देखील प्रकाशित झालेली आहेत. सध्या मागील दोनेक वर्षांत जलक्षेत्रात होत असलेल्या बदलांकडे आपण पाहिले तर हि जलक्रांती नक्कीच लक्षात येईल आणि आपणास उपेंद्रदादांच्या जलक्षेत्रातील कार्याची साक्ष पटेल.
केवळ शासकीय अधिकारी म्हणून पगारापुरते काम न करता उपेंद्रदादा आपल्या या अभियानातून हजारों निसर्गरक्षक निर्माण करत आहेत. फक्त सोशल मीडियावर तसेच वर्तमानपत्र – मासिकांतून लेख लिहिणे अथवा काही व्याख्यानं देणे एवढ्यावरच न थांबता जलक्षेत्रात आवश्यक प्रत्यक्ष कृती कार्यक्रमांत उतरून तांत्रिक परिपूर्णतेची आदर्श उदाहरणं लोकांपुढे ठेवण्यात त्यांनी काहीही कसर सोडली नाही. यातूनच आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निसर्गबेट, गाव तिथे तलाव, त्रिस्तरीय पुनर्भरण, जल आराखडा अशा संकल्पना प्रत्यक्षात साकार होताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून येत्या उन्हाळ्यात महाराष्ट्रभर जलक्षेत्रात नवीन १०० पेक्षा जास्त प्रकल्पांचा संकल्प आहे. म्हणूनच “उपेंद्रदादा हे सहज जलबोधकार म्हणून केवळ बोलके नव्हे तर कर्तेसुधारक आहेत” याचेच प्रतिक म्हणजे सहज जलबोध अभियान असं म्हणावं लागेल.