माळी समाज ठरवणार खामगांवचा आमदार

खामगांव, जि. बुलढाणा- सध्या विधानसभा निवडणूक प्रचाराची धामधूम मोठा उत्साहात सुरू आहे. खरतर निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सवच म्हणायला हवं. जिथून सामान्य लोकांसाठी विकासाची सूत्रे ठरवली जातात ते म्हणजे विधानसभा होय, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर निवडणूकमय वातावरण झाले आहे. कोण येणार? कोण पडणार? कोणाचा गेम होणार? सामाजिक गणित काय? यावर चौका चौकात चर्चा होताना दिसत आहे.
असेच काहीसे वातावरण खामगांव विधानसभा क्षेत्रात सुद्धा पाहायला मिळत आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणून खामगांवकडे पाहिल्या जाते. त्यातच आजी व माजी आमदार समोरासमोर उभे ठाकले असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. यावेळेस जो येणार तो टिकणार तर जो पडणार तो मात्र राजकारणातून कायमचा बाद होणार, अशी चर्चा सामान्य लोकांमध्ये रंगताना दिसत आहे.
यावेळी महायुतीकडून दहा वर्ष भाजपचे आमदार असणारे ॲड.आकाश फुंडकर तर महाविकास आघाडी तर्फे तीन वेळा आमदार राहिलेले राणा दिलीपकुमार सानंदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यातच वंचितचे देवाभाऊ हिवराळे हे सुद्धा मैदानात आहेत. दोन्ही बाजूने प्रचाराचे कार्य जोरदार चालू आहेत. मतदार संघात ठिकठिकाणी जाहीर सभा सुद्धा घेतल्या जात आहेत, त्यासाठी स्टार प्रचारक सुद्धा बोलाविण्यात येत आहेत. म्हणूनच काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
2019 मध्ये या मतदारसंघात भाजपचे ॲड.आकाश फुंडकर आणि काँग्रेसचे ज्ञानेश्वर पाटील यांच्यात लढत झाली होती. तेव्हा तब्बल 16,968 मताधिक्याने ॲड.आकाश फुंडकर यांचा विजय झाला होता. त्यांना एकूण 90,757 तर काँग्रेसचे ज्ञानेश्वर पाटील 73,789 मते पडली होती.
2014 मध्ये भाजपचे ॲड.आकाश फुंडकर आणि काँग्रेसचे राणा दिलीप कुमार सानंदा यांच्यात थेट लढत झाली होती. तेव्हा ॲड.आकाश फुंडकर यांना एकूण 71,819 मत मिळून त्यांचा विजय झाला होता. तर राणा दिलीपकुमार सानंदा यांना 64,758 मते आणि वंचितचे (तेव्हाची भारीप)अशोक सोनाने यांना 47,541 मते मिळाली होती. म्हणजे ॲड आकाश फुंडकर हे 7,061 मतांनी निवडून आले होते. एकूणच काय तर खामगाव मतदार संघात 7 ते 15 हजार मतांचा मर्जिन हा विजयी उमेदवारसाठी आवश्यक असतो.
महाराष्ट्राच्या राजकारणात जातीय राजकारणाला खूप महत्त्व आहे. प्रत्येक उमेदवार हा प्रत्येक जातीचे मतं आपल्याला मिळावे यासाठी प्रयत्नशील असतो. सध्या होऊ घातलेल्या खामगांव विधानसभा निवडणुकीत माळी समाज हा निर्णायक ठरणार असल्याचे बोलल्या जात आहे. राजकारणापासून बऱ्याच प्रमाणात अलिप्त असणारा आणि शेती करणारा, शांत, संयमी समाज म्हणून महाराष्ट्रभर माळी समाजाकडे पहिल्या जाते. खामगाव मतदार संघात अंदाजे जवळपास 50 हजाराच्या वर माळी समाजाची मते आहेत. त्यातच माळी समाजाचा कोणताही उमेदवार उभा नसल्याने या मताकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही मते आपल्याकडे वळवण्यासाठी दोन्हीही पक्ष आप आपल्या परीने प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.
प्रत्येक पक्षात प्रत्येक समाजाचे कार्यकर्ते असतात. त्यामुळे किमान 10% मते त्यांच्या पक्षाला पडत असतात. खामगाव मतदारसंघांमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी डायरेक्ट लढत होत असल्याने, माळी समाजाचे 10%-10% मते सोडून बाकीचे राहिलेले 80% मते ज्याला मिळणार तो नक्कीच विजयी होणार.
10% – 10% प्रत्येक पक्षाचे पक्के मतदान पकडल्यास, 50,000 चे 10% म्हणजे 5,000 म्हणजेच दोन्ही पक्षांचे मिळून 10,000 हे माळी समाजाच्या एकूण मतांमधून वजा केल्यास, बाकीचे 80% म्हणजेच 40,000 मते ही माळी समाजाची निर्णायक मते असणार आहेत व हेच ठरवणार खामगांवचा पुढील आमदार कोण ?”
हेच गणित दोन्ही पक्षांना माहीत असल्याने हे मतदान मिळवण्यासाठी त्यांचेही जोरदार प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी चांगले वाईट विषय उकरून काढून स्वतःच्या प्रचारासह विरोधी उमेदवाराचा अपप्रचार सुद्धा चांगल्या प्रकारे केला जात, असल्याचे समाजात बोलल्या जात आहे. दोन्ही पक्षांनी आपल्या पक्षातील माळी समाजातील कार्यकर्त्यांना चांगलेच कामाला लावलेले दिसत आहे. परंतु बाजू समाजाच्या हातात असल्याचे, आता माळी समाज कोणाचे पारडे जड करून विजयश्री देते हे पाहणे महत्वाचे ठरेल, त्यासाठी आपल्याला 23 तारीखच उजळवू द्यावी लागेल.