NMMS शिष्यवृत्ती योजना महा ज्योतीने सुरू करावी . राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाची अतुल सावे यांच्याकडे मागणी

कळंब- दि. 23 | राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना अर्थातच एन एम एम एस योजना महा ज्योतीने चालू करावी अशी मागणी राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय अतुलजी सावे यांच्याकडे करण्यात आली.
याबाबत वृत्त असे की, इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना चालू आहे. या विद्यार्थ्यांना या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास पुढील चार वर्षे 12000 रुपया प्रमाणे 48 हजार रुपयांची शिष्यवृत्ती सरकार विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करते.
राज्यातील सारथी या संस्थेने याच मेरिट यादी मधील उर्वरित मराठा व कुणबी, कुणबी मराठा या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक दहा हजार रुपये शिष्यवृत्ती योजना चालू केलेली आहे. त्यामुळे मराठा, कुणबी मराठा विद्यार्थ्यांची सोय झालेली आहे. त्याच प्रमाणे राज्यात बहुसंख्य असलेल्या व आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या इतर मागस प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाज्योती या संस्थेने अशीच शिष्यवृत्ती योजना लागू करावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष श्री संतोष भोजने, राज्य उपाध्यक्ष श्री सुखदेव भालेकर, जिल्हा संघटक श्री भास्कर कांबळे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे राज्याचे सहकार तथा इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी श्री .अतुल सावे यांनी ही मागणी रास्त असून याबाबत मी संचालक श्री राजेश खवले यांच्याशी चर्चा करून या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन राष्ट्रीय ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.