अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे राज्यातील सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांचा होणार सन्मान
शरदचंद्र पवार यांच्या हस्ते मुंबईत सोमवारी दि.२६ सप्टेंबर रोजी होणार सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान
मुंबई,नाशिक, दि.२४ सप्टेंबर | महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला १५० वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे राज्यातील सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांचा दि.२६ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सत्यशोधक समाजाच्या या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने सोमवार, दि. २६ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नरिमन पॉईंट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या सत्यशोधक समाज गौरव सोहळ्यामध्ये ज्येष्ठ समाजसेविका कमलताई विचारे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, ज्येष्ठ लेखक डॉ.आ.ह साळुंखे, संशोधक लेखक व ज्येष्ठ विचारवंत प्रा.रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजसेवक भारत पाटणकर आणि स्व.गेल ऑम्वेट, प्रज्ञावंत साहित्यिक उत्तम कांबळे, ज्येष्ठ संशोधक विचारवंत प्रा.हरी नरके यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे छगन भुजबळ यांनी कळविले आहे.