मुंजवाड येथे सत्यशोधक परीषेद उत्साहात संपन्न
सत्यशोधक नानासाहेब उत्तमराव पाटील (तरवडी) यांना सत्यशोधक समाज संघा तर्फे #जीवनगौरव_पुरस्कार
नाशिक – दि.26| सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव व सत्यशोधक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त ता. २६ जून २०२२ रोजी मुंजवाड येथे नाशिक जिल्हास्तरीय सत्यशोधक परिषद संपन्न झाली.
सदर परिषदेचे उद्घाटन माननीय नीलिमाताई पवार, नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज यांनी केले. उद्घाटकीय भाषणात ताई बोलल्या की संस्थेची निर्मिती महात्मा फुले व छत्रपती शाहू महाराज यांच्या सत्यशोधक विचारधारेवर झालेली आहे. ही संस्था अठरा पगड जातीच्या व सर्व धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण देण्यासाठी कार्य करते.
या नंतर नानासाहेब उत्तमराव पाटील तरवडी यांना सत्यशोधक समाज संघातर्फे जीवनगौरवपुरस्कार श्रीमती नीलिमाताई पवार व विचार मंचा वरील उपस्थितांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
उत्तमराव नाना यांनी सत्यशोधक चळवळीचे मुखपत्र दिनमित्र या साप्ताहिकाची संघर्षमय कथा श्रोत्यांसमोर मांडली. नवीन पिढीने सत्यशोधक पद्धतीचा व विधीचा अवलंब करण्याचे आग्रहाचे आवाहन केले.
प्रा. अशोक सोनवणे सर यांनी नाशिक जिल्ह्यातील सत्यशोधक चळवळीचा इतिहास सविस्तरपने मांडला. त्यानंतर मा. प्रा. जी.ए.उगले सर यांनी बहुजन, वंचित आणि स्त्रिया या घटकांच्या संदर्भातील सत्यशोधक समाजाचे मूलगामी विचार मांडले. बहुजन समाजाने धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होणेसाठी इहवादी, जीवनवादी, विज्ञानवादी इत्यादी विद्यार्थी घडविण्याचे आवाहन केले.
नाशिक जिल्ह्यातील सत्यशोधकांचे स्मारके उभारणार-डॉ. सुरेश झाल्टे.
त्यानंतर अध्यक्षीय समारोपात डॉ. सुरेश झाल्टे यांनी सत्यशोधक चळवळ ही शिक्षण, शेती व संस्कृती या तीन बहुजनमूल्यच्या विकास करणारी आहे तरी समाजाने स्वतःची व समाजाची प्रगती करून घेण्यासाठी सत्यशोधक चळवळ व सत्यशोधक पद्धतीने जीवनातील सर्व प्रकारचे विधी करणे गरजेचे आहे. शूद्र अतिशुद्र व स्त्रियांनी वैदिक संस्कृती नाकारून आपली मूळ कृषी संस्कृती म्हणजेच आपले कुलदैवत व ग्रामदैवत यांच्या विचारानेच जीवन जगलं पाहिजे. [ads1]
या परिषदेला विश्वासराव मोरे, प्रकाशराव कवडे, प्रा. वसंतराव गोवर्धने, सटाण्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे चेअरमन गोकुळराव जाधव, जिल्हा परिषद सदस्य मीनाताई मोरे, मुंजवाडच्या सरपंच पवार ताई, विलास दंडगव्हाळ, नरेंद्र खैरनार, रोहित तरटे, गोविंद वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. मुंजवाड गावातील व पंचक्रोशीतील अनेक स्त्री-पुरुष, विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, व्यापारी या परिषदेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सत्यशोधक परिषदेत २ मे १९३७ रोजी मुंजवाड येथे झालेल्या दिनमित्र साप्ताहिकाच्या सिल्वर जुबली समारंभाच्या आयोजकांच्या विद्यमान वंशजांचा सत्यशोधक समाज संघातर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.[ads2]
परिषदेचे सूत्रसंचालन प्रमोद पाटील सर एरंडोल यांनी केले तर प्रास्ताविक सुदर्शन जाधव यांनी केले व आप्पा जगताप यांनी आभार मानले. नाशिक येथील कवी काशिनाथ महाजन यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक कवनांचे गायन केले.
सदरील सत्यशोधक परिषदेत खालील प्रकारे सहा ठराव मांडण्यात येऊन सर्वसंमतीने पारित करण्यात आले.
1️⃣जाती व पोटजाती व्यतिरिक्त अन्य जातीत (अंतर्जातीय) विवाह संबंध करण्यात यावेत.
2️⃣शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा.
3️⃣सत्यशोधक पद्धतीनुसार समाजाने सर्व विधी करावेत याचा प्रचार व प्रसार करण्यात यावा.
4️⃣ समाजातील अनिष्ट असलेली विधवा प्रथा बंद करण्यात यावी.
5️⃣ ओबीसीसह सर्वजातींची जनगणना करण्यासाठी ग्रामपंचायतींनी ठराव पारित करून शासनास पाठविणे.
6️⃣ लग्न, साखरपुडा यासारखे विधी साध्या पद्धतीने करून त्यातील वाचलेला पैसा शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी वापरावा. [ads3]
उपरोक्त ठरावांचे वाचन राकेश मोरे यांनी केले.
सत्यशोधक परिषद यशस्वी करण्यासाठी सुदर्शन जाधव, शंकर जाधव, भरत शेलार, राकेश मोरे, प्रशांत बागुल, दिगंबर जाधव, विनोद खैरनार, रमेश बच्छाव व मुंजवाडच्या ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.