महात्मा फुले लिखित ‘शेतकऱ्याचा असुड’ मधून व्यक्त होणारे शेतकरी जीवनाचे प्रश्न आणि उपायोजना डॉ. नूतन लोणकर- नेवसे
भारतीय इतिहासाचा गंभीरपणे मागोवा घेतल्यास आपल्या लक्षात येते की कितीतरी राजवटी, शासनव्यवस्था बदलल्या परंतु शेतकऱ्याचे शोषण झाले नाही अशी दुर्मिळच राजवट आपल्याला सापडते. शेतकऱ्यांचे प्रश्न हे न संपणारे आहेत. शासनव्यवस्था बदलते, नेतृत्व बदलते परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न बदलत नाहीत ते तसेच राहतात एकोणिसाव्या शतकात महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल अचूक विश्लेषण केलेले आहे.
आतापर्यंतच्या एकूण भारतीय परंपरेत शेतीचा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा एवढ्या गंभीरपणे विचार कोणी केला नव्हता. तो प्रथम महात्मा फुले यांनी केलेला आहे. ग्रामीण जनता तिचे प्रश्न त्यांची दुःखे यांना प्रथमत:च महात्मा फुले यांच्या ‘शेतकऱ्याचा असुड’ या ग्रंथाच्या रुपाने वाचा फुटली आहे. ‘शेतकऱ्याचा असुड'(1883) या ग्रंथात त्यांनी अतिशय पोटतिडकीने लिहिलेले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेऊन त्यावर त्यांनी उपाययोजनाही सुचविल्या आहेत.
महात्मा फुले यांच्या शेतकऱ्यांच्या आस्थेविषयी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणतात की, “खरे म्हणजे महात्मा फुल्यांचे एकूण लेखनच मुळी शेतकरी, कष्टकरी यांचा आक्रोश शब्दांकित करणारे आहे. ‘शेतकऱ्याचा असुड’ मध्ये ते अधिक धारदार ,अधिक टोकदार ,अधिक स्पोटक आणि विस्तारित स्वरूपात आहे यादृष्टीने ‘शेतकऱ्याचा असूड’ हा ग्रंथ एकूण महात्मा फुले यांच्या वाङ् मयसंभारात मोलाचा ठरावा. ‘शेतकऱ्याचा असूड’ हा ग्रंथ प्रामुख्याने मध्यम व कनिष्ठ प्रतीच्या शेतकऱ्याची हलाखी व दुःखे प्रकट करणारा आहे”.वरील विवेचनात डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी महात्मा फुले यांच्या लेखनाचे मर्म उलगडून दाखवले आहे. महात्मा फुले यांच्या साहित्यामध्ये उपेक्षित कष्टकरी समाज केंद्रस्थानी होता हे यातून लक्षात येते. ‘
शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथाविषयी भा. ल. भोळे म्हणतात की, शेतकरी वर्गाचा जीवनक्रम आणि शेतीविषयक प्रश्न यांचे इतके समग्र, सखोल आणि आस्थेवाईक चित्रण जोतीरावांनपूर्वी बहुधा कोणीच केले नसावे. विशेषत: मध्यम व कनिष्ठ शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि मानसिक वस्तुस्थितीचे असंख्य तपशील या ग्रंथाच्या पानोपानी शब्दांकित केले आहेत. या शेतकऱ्यांची दुरावस्था किती भीषण आहे, ती तशी होण्याची कारणे कोणती आहेत आणि त्यांचे निराकरण कोणत्या उपायांनी होऊ शकेल, याचा उहापोह जोतीरावांनी या ग्रंथात केला आहे”.
या मतावरून आपल्याला लक्षात येते की, शेतकरी जीवन हा महात्मा फुले यांच्या आस्थेचा व चिकित्सेचा भाग होता. शेतकरी वर्गाचे अज्ञान, त्यापायी होणारे त्यांच्या आर्थिक व सामाजिक शोषण आणि फसवणूक, शेतकरी वर्गाची भट ब्राह्मण व या देशातील इंग्रज कशी गळचेपी करतात याचे दाहक चित्रण, दुष्काळ, कर्जबाजारीपणा, शेतीची आधुनिक पद्धती, कालवे, पाणीपुरवठा, खार जमिनीचे प्रश्न, प्रगत अवजारे शेतकऱ्यांचासमोरील आर्थिक, सामाजिक, धार्मिक प्रश्नांचा विचार महात्मा फुले या ग्रंथात करतात केवळ प्रश्न मांडून थांबत नाही तर उपायही सुचवतात.
या ग्रंथात फुलांनी एक प्रकारचा संवाद केला आहे. तो संवाद हा निश्चितच शेतकरीहीत जोपासणारा व समाजातील लोकांना शेतकर्यांच्या दयनीय स्थितीची जाणीव करून देणारा आहे. शेतकरी वर्ग शिक्षित नसल्यामुळे त्यांना त्यांच्या हक्कांची, कर्तव्यांची जाणीव होत नव्हती परिणामी ते या इंग्रज व भट ब्राह्मणांच्या अन्याय अत्याचाराला बळी पडत असत. शेतकऱ्याचा असूड या ग्रंथातील पहिल्या प्रकरणात ते असे नमूद करतात की “आता पहिल्या प्रकारचे अक्षर शून्य शेतकऱ्यास भट ब्राह्मण धर्ममिषाने इतके नाडितात की त्यांज विषयी या जगात दुसरा कोठे या मासल्याचा पडोसा सापडणे फार कठीण”. येथल्या भट ब्राह्मण मंडळींनी शेतकऱ्यास इतके उघडे केले की, जगात त्यांच्याइतका कुणालाही त्यांनी त्रास दिला नाही. ते शेतकऱ्यांना पूजेच्या निमित्ताने, त्यांच्या घरी नवीन मुले जन्मली की, लग्नप्रसंगी अशा अनेक प्रसंगी त्यांना काहीतरी खोटी माहिती देऊन धर्म संसाराच्या नावाखाली त्यांना बुडवत.[ads1]
येथील शेतकरी वर्गांना इंग्रज अधिकारी कर लावीत असत. त्यात शेतसारा या कराचा समावेश होता. या कराच्या बो ज्यामुळे शेतकरी पूर्णतः कंगाल होई. बहुतेक शेतकरी वर्ग हा कोरडवाहू शेतकरी होता त्याची शेती पूर्णता: पावसाच्या पाण्यावर अवलंबून असायची. त्यामुळे कधी पाऊस झाला नाही की शेतकरी वर्गाचे उत्पन्न बुडायचे व त्यांना सावकाराकडून कर्ज घेऊन आपला निर्वाह करावा लागायचा त्यामुळे ते कर्जबाजारी होत असत. पूर्वी शेतकरऱ्यांजवळ फारच थोडी शेती असे व ज्यांचा आपल्या शेतीवर निर्वाह होत नसे ते आसपासच्या डोंगरदऱ्यांतून ,जंगलांतून उंबर, जांभूळ वगैरे पिकाची शेती करत. पण या देशात इंग्रजांनी शेतीची आपली शक्कल लढवून जंगल खातेच करून टाकले यामुळे शेतकऱ्यांना आपली गुरे-ढोरे चारण्यासाठी जागाच उरली नाही व उत्पन्नही बंद झाले.[ads2]
शेतकरी वर्गातील मुलांना शिक्षण न देणे त्यांच्या शेतीच्या अडचणी संदर्भात त्यांना योग्य मार्गदर्शन न करणे, त्यांच्यावर खोटे आरोप लावणे, त्यांच्याकडून देणग्या उकळणे असे प्रश्न प्रकरणदोन मध्ये फुल्यांनी मांडले आहेत. प्रकरण तीनमध्ये फुल्यांनी सावकारांनी व मारवाड्यांनी शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करून त्यांना अटृल कर्जबाजारी बनविले उच्चवर्णीयांनी उच्च व शूद्र असा भेद करून शुद्रांना अज्ञानात ठेवले व आपली पोळी भाजून घेतली असे फुले म्हणतात. शेतकऱ्यांच्या या अवनत अवस्थेला पोलीस पाटील, व्यापारी हे कारणीभूत आहेत.शूद्र शेतकरी स्वतःच्या अहितास स्वतःही काही प्रमाणात जबाबदार आहे असे फुले म्हणतात.[ads3]
शेतकऱ्यांचे अज्ञान, अशिक्षितपणा त्यांना मिळणारे शिक्षण हे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्याला आपल्या घरच्या हिशोबाचे टाचणे देखील बनवण्या इतपत ही ज्ञान मिळत नाही, तर मामलेदार कचेरीत प्रवेश घेऊन कारकुनाची नोकरी मिळणे कठीणच होते. धर्मदृष्ट्याही तो अज्ञानी राहिल्यामुळे नाडला जातो. त्याच्या धर्मभोळेपणा मुळे भट -ब्राह्मण त्याची धर्मासंबंधी लूट करतात. सरकारी वेतन, पेन्शन व प्रशासनाचा सर्व खर्च शेतकऱ्यांकडूनच सरकार वसूल करत असे. यासाठी नित्य नवे कर लादण्याचा क्रम सरकारने सुरू केल्यामुळे शेतकरी अस्सल कर्जबाजारी झाला होता. तसेच परकीय इंग्रज अधिकारी हे गाई बैलांचे मांस खाणारे असल्यामुळे शेतकऱ्यां जवळ ज्या चांगल्या गायी-बैले होती ती कमी होऊन कष्टाच्या कामासाठी उपयोगी पडणाऱ्या बैलाच्या जोड्याच शिल्लक राहिल्या नाहीत. त्याचप्रमाणे दुष्काळात चारा पाण्यावाचून लक्षावधी बैलांचा बळी गेला. सरकार मन मानेल तसे शेतसारा वाढवू लागले त्यामुळे शेतकऱ्यास पोटभर भाकर व अंगभर वस्त्र मिळेनासे झाले. ते शक्तिहीन झाल्यामुळे महामारीच्या साथीने व दुष्काळामुळेही अन्नावाचून लक्षावधी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.[ads4]
वरील सर्व प्रश्नांचा विचार महात्मा फुले अतिशय गंभीरपणे करतात व शेतकर्यांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजनाही सांगतात. शेतकऱ्यांनी आचरण सुधारावे उदाहरणार्थ. शूद्र शेतकऱ्यांनी एकी पेक्षा जास्त बायका करू नये .आपल्या मुलामुलींची लग्ने लहानपणी करू नये. शेतकऱ्यांच्या मुलांनी शाळेत जाण्यासंबंधी कायदा करावा .शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारी नोकर्या द्याव्यात.तसेच ते शेतीची अवस्था सुधारण्यासाठी काही उपाय सांगतात. त्यामध्ये शेतकऱ्यांना यंत्राद्वारे शेती करण्याचे शिक्षण देणे. शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करणे. जमिनीची धूप थांबवण्याचा बंदोबस्त करणे.पाणलोटाच्या बाजूने नालीबंधारे बांधणे. तलाव तळी बांधणे. धरणे बांधणे, पाण्याच्या स्त्रोतांचा शोध घेणे. वनखात्याच्या अतिरिक्त जमिनी कसण्यासाठी देणे. शेतीविषयक प्रदर्शन भरविणे. शेतकऱ्यांमध्ये विविध पिकांसंदर्भात स्पर्धा घेणे. त्यांना बक्षीस देणे. शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण. शेती संदर्भातील उपयुक्त ग्रंथांची निर्मिती करणे. सैन्य व पोलिस दलातील मनुष्यबळ शेतीसाठी वापरणे. शासनातील अनुत्पादक घटकांवरील खर्च कमी करून शेतीसाठी वापरणे. यांसारखे उपाय महात्मा फुले सुचवतात त्यांचे एकच ध्येय होते, की शेतकऱ्यांत मूलगामी स्वरूपाचे परिवर्तन व्हावे हे सगळे उपाय आजही फार उपयुक्त असल्याचे आपल्या लक्षात येते.[ads5]
स्वातंत्र्यानंतर गेल्या पन्नास वर्षात शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये महात्मा फुले यांनी सांगितलेल्या उपायांचा अवलंब केल्याचे लक्षात येते पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम, पाटबंधारे विभागाचे काम, पशुपालनाच्या विविध शासकीय योजना यातून महात्मा फुले यांनी सांगितलेले विचारच स्वीकारल्याचे आपल्या लक्षात येते. यातून महात्मा फुल्यांच्या दूरदृष्टीपणाचे महत्त्व आपल्या लक्षात येते. ‘शेतकऱ्याचा असूड’ हा ग्रंथ शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा व शेतकरी वर्गाच्या स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी मार्गदाता ठरलेला आहे .हा ग्रंथ महात्मा फुल्यांच्या कृषी संवादाचे प्रमुख साधन आहे असे म्हणता येईल[author title=”डॉ. नूतन लोणकर -नेवसे” image=”https://krantisuryanews.in/wp-content/uploads/2022/05/Screenshot_20220511-144240_WhatsApp.jpg”]मु़. पो. नायगाव, ता. खंडाळा जि. सातारा मो. नं. 9623031635.[/author]