आपला जिल्हा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून द्या – मंत्री छगन भुजबळ

नाशिक, सटाणा,दि.७ मे :-* पक्षाची ताकद ही किती लोकप्रतिनिधी निवडून येतील यावर ठरत असते. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्तीत जास्त उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निवडून द्यावेत तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सटाणा येथे बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, माजी आमदार तथा महिला आयोगाच्या सदस्य दिपिका चव्हाण, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, सामाजिक न्याय विभागाचे यशवंत शिरसाठ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, स्व. यशवंतराव चव्हाण आणि खासदार शरद पवार साहेब यांनी नेहमीच बेरजेच राजकारण केलं आहे. त्यामुळे आपापसातील वाद बाजूला ठेऊन आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूक बेरजेच राजकारण करा असे त्यांनी यावेळी सांगितले. खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्यासारखे देशव्यापी नेतृत्व आपल्याला लाभलं आहे. ज्यांना देशातील सर्व क्षेत्रांची जाण आहे. ते अहोरात्र जनतेच्या हितासाठी काम करता आहे. त्यांचाच आदर्श घेऊन पक्षातील सर्व पदाधिकारी काम करतात. कुठल्याही पक्षातील पदाधिकारी एवढं काम करत नाही एवढं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी काम करतात याची मला खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, लोकमान्य टिळक हे बहुजन समाजाच्या शिक्षणाच्या विरोधात होते. त्यांनी त्यावेळी छत्रपती शाहू महाराज यांना पत्र लिहुन तुमच्या शाळेला कौले बसावा मग शिकवा असे पत्र लिहिले होते. त्यावेळी छत्रपती शाहू महाराज यांनी टिळकांना माझी मुलं भिजली तरी चालतील मात्र ती शिकली पाहिजे असे पत्र लिहिले. हा इतिहास सर्वांनी वाचावा त्यांचे विचार अंमलात आणावे असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, जे देशात सत्तेवर आले आहे त्यांनी केवळ विकण्याचा धंदा केला आहे. देशाच्या अनेक संस्था विकण्याशिवाय कुठलही काम त्यांनी केलं नाही. महागाई वाढत असल्याने याकडे दुर्लक्ष करण्यासाठी भोंगे पुढे आणले जात असून धर्मधर्मात तेढ निर्माण करण्यात प्रयत्न केला जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. तसेच देशात सध्या आर आर आर चित्रपटाप्रमाणे राणे, राणा आणि राज हे सूत्र जमले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, माजी आमदार संजय चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button