शिवजयंती निमित्त पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून नाशिक शहरातील विविध मंडळांना भेटी
नाशिक,दि.१९ फेब्रुवारी | छत्रपती शिवाजी महाराज यांनी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती. समाजातील अन्याय झालेल्या वंचितांना न्याय देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं. त्यांच्या या विचारांचा वारसा आपल्याला पुढे चालू ठेवायचा असून वर्षभर समाजातील सर्व घटकांची सेवा आपण केली तर हीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी अभिवादन ठरेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज नाशिक शहरातील विविध मंडळांना भेटी देत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, शिवजन्मोत्सव समितीचे मामा राजवाडे, अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, चेतन शेलार, अॅड.गौरव गोवर्धने, संजय रामराव राऊत, किशोर जाचक,कैलास मुदलियार,जीवन रायते, बाळा निगळ, योगेश निसाळ,विक्रम कोठुळे,ऍड.चिन्मय गाढे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
समाजातील सर्व घटकांची वर्षभर सेवा हेच छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन – मंत्री छगन भुजबळ
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीतील लोकांना सोबत घेत स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्यात कुणावरही अन्याय होणार नाही यासाठी त्यांनी याकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळे सर्व समाज त्यांच्या पाठीशी उभा होता. त्यांच्या या कार्याची स्फूर्ती घेऊन वाटचाल करावी. त्यांचे विचार समाजात रुजविण्यास प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले. आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्वाचा असून विविध उपक्रमातून महाराजांच्या चरणी आपली भक्ती आपण अर्पण करूया असे त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने नाशिक शहरातील पंचवटी शिवजन्मोत्सव समिती, छत्रपती शिवाजी स्मारक सी.बी.एस, एस.एफ.सी फाउंडेशन मैदान पंचवटी, हिरावाडी जन्मोत्सव समिती,जाणता राजा मैदान सातपूर आणि नाशिकरोड शिवजयंती उत्सव मंडळ या मंडळांना भेटी दिल्या.