आणि पुन्हा सावित्री संस्कार देण्यास जन्मास यावी
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्त आयोजित लेखमाला

होत्या स्त्रिया चार भिंतीच्या आत स्त्री शिक्षणासाठी लाभली सावित्रीबाईची साथ,
सावित्रीबाईने स्त्रीला उद्घारिले, शिक्षणासाठी दालन खुले करून दिले.
स्त्री आता आकाशात भरारी घेत आहे. अस वाटत आहे स्त्रियांना पुढे भरारी घेण्यासाठी आकाशही ठेंगणे झाले आहे. स्त्रिया समाजाच्या रूढी परंपरेत जखडलेल्या होत्या. स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता, स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करीत असली, तरी अजूनही स्त्रियांना हवा तसा मान सन्मान मिळत नाही. समाजात सावित्रीच्या मुलींची संख्या जरी वाढली तरी मात्र जोतिबांची साथ मात्र अजूनही हवी तशी मिळाली नाही. असे कुठलेही क्षेत्र नाही ज्या ठिकाणी महिला कार्यरत नाही. सावित्री बाई मुळेच महिला प्रत्येक ठिकाणी सक्षमपणे काम करताना दिसतात. आम्ही अबला नाही तर सबला आहोत. फक्त आमच्या कार्याचे महत्त्व सर्वांनी जाणून घ्यायचे आहे. तसेच आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीला याची जाणीव करून द्यायची आहे. कारण ज्योतिबांनी फक्त सावित्रीबाई साठीच नाही, तर प्रत्येक स्त्रीला समाजात उच्च स्थान मिळावं आणि तिच्या वरचा अन्याय, अत्याचार कमी व्हावा यासाठी तिला शिक्षण रुपी वाघिणीचे दूध प्राशन करायला लावले.
मनुवाद्यांनी स्त्रियांचे क्षेत्र चूल व मुलं इथवरच सीमित केलं होतं. बस रांधा- वाढा- उष्टी काढा, पण तरीही हे सर्व करून घरची जबाबदारी स्वीकारून त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कृतीतून दाखवून दिलं की, स्त्री कुटुंबालाच नवे, राज्यालाच नव्हे, तर देशाला सर्वोच्च स्थान मिळू शकतात. त्यासाठी शिक्षित होणे गरजेचे आहे. हे महात्मा फुले यांनी ओळखले त्यासाठी त्यांनी 1848 मध्ये पुणे येथील बुधवार पेठ भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्यासाठी शाळेत शिकवण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीला शिक्षित केले आणि पहिली महिला शिक्षिका बनवले. त्यानंतर सावित्रीबाईना मनुवाद्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. केव्हा शेण तर केव्हा चिखल फेकून मारला, त्यांचं मनोधैर्य खचायल हवं म्हणून टवाळखोर मुलं रस्त्यावर उभे असत. दिवसोनदिवस हा त्यांचा त्रास वाढतच होता. त्यासाठी शाळेचा शिपाई त्यांच्या संरक्षणासाठी राहू लागला, पण एक दिवस काही कारणास्तव शिपाई बरोबर येऊ शकला नाही. त्यावेळी त्यांना एकट बघून एका गावगुंडाने अडवलं व धमकावले “मुलींना व तळागाळातील लोकांना शिकवणं बंद कर नाही तर बरे होणार नाही”, सावित्रीबाईची फजिती बघायला सगळे जमा झाले. कारण तो गावगुंड भयानक आवाजात बोलत होता. सावित्रीबाईंनी थोडया गोंधळल्या आणि क्षणात कोणताही विचार न करता त्या गावगुंडाचा चांगलाच समाचार घेत एक थोबाडीत भिरकावली. मार्ग कितीही खडतर आले तरी काही केल्या सावित्रीबाई थांबली नाही. कशाचीही पर्वा न करता अविरतपणे त्यांचे शिक्षणाचे कार्य सुरूच ठेवले.
अचानक झालेल्या ह्या हल्ल्यामुळे तो गावगुंड पळून गेला. आणि सावित्रीबाईच्या शौर्याची कीर्ती सर्वत्र पसरली व त्यांचा त्रास पण थोडा कमी झाला. शाळेला प्रतिसाद मिळाला त्यामुळे ज्योतीबानी 4 ते 5 शाळा आणखी पुण्यात सुरू केल्या. सावित्रीबाई महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिला अध्यापिका होत्या. त्यांच्या आधी भारतीय महिलेने शिक्षिका म्हणून काम केल्याचा दाखला इतिहासात नाही. त्यांच्या कार्याने ना समाज खुष होता, समाज सोडा स्वतःचे घरचे सुद्धा त्यांना मदत करण्यास तयार नव्हते. त्यांनी घरच्यांची खुप विनवनी केली, परंतु त्यांना या समाजकार्यासाठी घर सोडावे लागले.
त्याच वेळी धर्मगुरूच्या व भोंदू बाबांच्या विरोधी चळवळ सुरू झालेल्या. भारतीय समाजाने फुले यांच्या कार्याची दखल घेतली नाही. पण दूरदृष्टीच्या इंग्रजांनी मात्र दखल घेतली. मेजर कँडी यांनी पुण्याच्या विश्रामगृहात सत्कार सभा घेऊन जोतीराव व सावित्री यांचा सत्कार केला. त्यावेळी काही चांगले लोक त्यांच्या कार्यात मदत करायला तयार होते. त्यांच्या पुढाकाराने पुढे 17 ते 18 वा शाळा सुरू झाल्या. दलित व तळागाळातील सर्वांना शिक्षणाच्या सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्यास त्यांची गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी फुले कुटुंब प्रयत्न करीत होते. त्यावेळी सतीची चाल, बालविवाह, विधवेचे केशवपन करणे, तिचे कुंकू पुसने, अंधाऱ्या खोलीत तिला जीवन कंठावे लागे आणि आयुष्यभर नरकयातना सहन करावा लागत.
हे पाहून सावित्रीआईला अतिशय दुःख होई या सर्वांविरुद्ध जोतीराव व सावित्री पेटून उठले कुमारीका, विधवा, बालिका यांच्यासाठी वसतिगृह सुरू केली. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. त्यांनी स्वतः यशवंत नामक मुलास दत्तक घेऊन त्याला मोठे डॉक्टर बनवले. मला अजूनही खंत आहे की आज आमची माय माऊलीआमच्या सोबत असती तर, निर्भयासारखे अन्याय, अत्याचार आमच्यवर झाले नसते. शिकून सरवून जरी स्त्री मोकळ्या आकाशात भरारी घेते. पण आजही हुंडाबळी, स्त्रीभ्रूण हत्या, बलात्कार हे प्रकार थांबले आहेत काय ? आजही स्त्री मनाच्या, शरीराच्या चिंध्या-चिंध्या होत आहेत.
घरची लक्ष्मी च्या नावाखाली संपूर्ण परिवाराचे ओझे लादले जात आहे. एक बटकीन म्हणून वागवले जाते. समाजात सर्वत्र स्त्री-भ्रूणहत्या करून मुलींची संख्या कमी करण्याचा पराक्रम पण आपण गाजविला. अजूनही स्त्री शिक्षणाची आबाळ होते व उच्च शिक्षणासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात. तरी हवे तसे शिक्षण मिळत नाही अजूनही बरेच ठिकाणी स्त्रियांना व तळागाळातील लोकांना भेदभावाची वागणूक मिळत आहे आज पुन्हा एकदा क्रांतीसुर्य व क्रांती ज्योती सावित्रीबाई ची समाजाला गरज आहे. त्यांनी पुन्हा एकदा भारतभूमीत जन्मला यायला हवे आणि त्यांनी लावलेल्या इवल्याशा रोपट्याचा वटवृक्ष बघावा. आणि या वटवृक्षाच्या संरक्षणासाठी आपले मौल्यवान विचार समाजातील महाभागांना द्यावे एवढीच इच्छा
[author title=”सौ प्रतिभा भास्कर शिरभाते” image=”https://krantisuryanews.in/wp-content/uploads/2022/01/IMG-20220102-WA0054.jpg”]जिल्हा उपाध्यक्ष महात्मा फुले समता परिषद छोटी उमरी अकोला 8483031046[/author]