छत्तीसगढचे ‘मुख्यमंत्री भूपेश बघेल’ यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने गौरव
पुणे- दि. 28 |अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यावर्षी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्करामध्ये रुपये एक लक्ष, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे.
माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सर्व प्रथम मंडल आयोग लागू करण्यात आला. त्यातून महाराष्ट्रात विविध क्षेत्रात ओबीसींचे आरक्षण आपल्याला मिळाले. मात्र केंद्र सरकारच्या नाकर्ते धोरणामुळे हे आरक्षण धोक्यात आले आहे. आरक्षण पूर्ववत करण्यासाठी जनगणनेची आवश्यकता आहे. कोरोनामुळे केंद्र सरकार २०२१ ची जनगणना सुरू करत नाही. मात्र महाराष्ट्र सरकारला करण्याचा आग्रह धरत आहे. सरकारने ही जनगणना होईपर्यंत आरक्षण पूर्ववत सुरू ठेवावे अशी मागणी करत ओबीसींचे राजकीय आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. या कार्यक्रम प्रसंगी त्यांनी ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे असा ठराव पारित केला.
यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, मध्यप्रदेश सतनाचे आमदार सिद्धार्थ कुशवाह, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार पंकज भुजबळ, कमलताई ढोले पाटील, जयदेव गायकवाड, दिप्ती चौधरी,बापूसाहेब भुजबळ, प्रा.हरी नरके, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, मंजिरी धाडगे, मनीषा लडकत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सुनील सरदार, डॉ.रत्नाकर लाल, पुणे विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, प्रा.दिवाकर गमे, ऍड.सुभाष राऊत, पुणे शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, वैष्णवी सातव, अविनाश चौरे,मनीषा लडकत, आंबदास गरूडकर, यांच्यासह पदाधिकारी व समता सैनिक उपस्थित होते.
छत्तीसगढ राज्यात बहुजन समाजातील नेतृत्व भूपेश बघेल यांच्या रूपाने मुख्यमंत्री पदावर काम करत आहे. त्यामुळे गोर गरिबांचे कामे होत असल्याचे लोकांसाठी जे लढतात ते चिरकाल स्मरणात राहतात त्यामुळे तुमचं नेतृत्व तुम्हीच निर्माण करा.महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाले आहे. मात्र काही लोकांना अद्यापही “डायजेस्ट” होत नसल्याची टीका करत सोनिया गांधी, शरदचंद्र पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करत आहे. हे सरकार आपले पाच वर्षे पूर्ण करेल.
फुले, शाहू, आंबेडकर यांच्यामुळे आपल्याला आरक्षण मिळाले. ज्यांनी आपले आयुष्य आपल्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी व्यथित केले त्यांना आपण विसरता कामा नये. सगळीकडे महात्मा फुले व सावित्रीबाई यांचे पुतळे उभारण्यात यावे छत्रपती शाहू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांचे कार्यक्रम घ्यावेत. तसेच गल्ली गल्लीतून फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाचा नारा दिला जावा. देशातील शेतकऱ्यांसाठी लढले पाहिजे. आपल्या न्याय हक्कासाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर वर्षभर लढा दिला. या शेतकऱ्यांच्या लढ्यापुढे मोदी सरकारला झुकावे लागले आहे. शेतकऱ्यांसाठी हा लढा लढण्यासाठी आपण पुढे न्यायला पाहिजे असे आवाहन उपस्थितांना केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद देशभरात काम करत असून देशभरात आरक्षणाची लढाई लढली जात आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येत असून तीन जानेवारी रोजी हा पुतळा विद्यापीठात बसविण्यात येणार आहे. तसेच महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक एकत्र जोडले जाणार असून भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरु करण्यात येईल. पुतळे उभे करण्यासोबतच त्यांच्या विचारांची कामे प्रत्यक्षात उभे करून त्यांची खरी स्मारक उभी करण्यात येईल.
देशातील खाजगीकरणाच्या विरोधात सामूहिक लढ्याची गरज – मुख्यमंत्री भूपेश बघेल
यावेळी मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, देशातील सर्व शासकीय प्रकल्प विकण्याचा घाट केंद्र सरकार कडून घातला जात आहे. त्यामुळे शासकीय नोकऱ्या कमी झाल्या आहे. त्यामुळे आपल्याला २७ आरक्षण जरी मिळाले तर शासकीय नोकरीच मिळणार नाही. त्यामुळे खाजगीकरणाच्या विरोधात लढावे लागेल असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच आरक्षण वाचविण्यासाठी छत्तीसगढ राज्यात ओबीसींची जनगणना करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाज सुधारणेच्या कामाची सुरुवात या भावनातून झाली. समाजातील वंचित पिडीत शोषित घटकाला न्याय देण्यासाठी सर्व काही पणाला लावले. महिलांना समाजात सन्मान देण्याचे काम त्यांनी केले. वाड्यात या विहिरीत पाण्याने समाजातील वंचित घटकांची तहान भागविली त्यातून समाजक्रांती झाली. या समाज सुधारकांच्या या भूमीला वंदन करतो असे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, महात्मा फुले यांचे वयाचे ६३ वर्ष समाज क्रांतीचा लढा दिला. त्यांनी लावलेली ज्योत आजही तेवत आहे. उत्कट क्रांतीकारी जीवन महात्मा फुले यांचे होते. कुठल्याही समस्ये पासून त्यांनी माघार न घेता समाजातील वंचित, पीडित घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. अंधविश्वासावर प्रहार करून ती नष्ट करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. देशात साडेतीन हजार वर्षे पीडित समाजाने काम केलं. त्यामुळे जगाच्या आर्थिक उत्पन्नात भारताचा २३ टक्के वाटा होता. त्यामुळे भारताला सोने की चिडीया असे संबोधले जात होते. ब्रिटिश आल्यानंतर परिस्थिती बदलली. त्यावेळी समतेची ज्योत महात्मा फुले लावली. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढले त्यांना न्याय मिळवून दिला. त्याच महात्मा फुले यांच्या विचारांवर छत्तीसगढ राज्य कार्य करत असून शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, सत्यशोधक समाजाची स्थापना करून शिक्षणाच्या माध्यमातून सत्याचा आग्रह धरला त्यातुन अंधविश्वास दूर करण्यास प्रयत्न केले. महात्मा फुले यांचे विचार आणि पुढे महात्मा गांधी यांचे सत्याचे प्रयोगातून पुढे नेले. महात्मा फुले यांचे विचार महात्मा गांधी यांनी पुढे नेले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हेच विचार संविधानाच्या माध्यमातून आपणास दिले. ते संविधान आज धोक्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महात्मा फुले समाजिक क्रांतीचे अग्रणी तर महात्मा गांधीजी राजकीय समाज सुधारणेचे अग्रणी होते. महात्मा फुले, महात्मा गांधी यांच्या काळात ज्या समस्या निर्माण झाल्या होत्या त्या आज पुन्हा निर्माण झाल्या असून त्याविषयी आपल्याला लढावे लागेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रा.हरी नरके,महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष बापू भुजबळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.नागेश गवळी यांनी तर आभार प्रदर्शन प्रित्येश गवळी यांनी केले.