आपला जिल्हा

सत्यपाल महाराजांना महाराष्ट्रभूषण द्या – वऱ्हाडी कट्टा

शेगाव दि १४ -सप्तखंजिरी च्या माध्यमातून ४५ वर्षांपासून वऱ्हाडी बोलीतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, लोकशिक्षक गाडगेबाबा यांच्यासह सर्व महामानवांचे कांतीकारी विचार बहुजन समाजापुढे मांडून समाज प्रबोधन करणारे सप्तखंजेरीवादक लोकप्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करावे, अशी मागणी ठरावाच्या रूपाने वऱ्हाडी कट्टा फेसबूक समूहाच्या स्नेहमिलन सोहळ्यात करण्यात आली.

सुप्रसिद्ध कवी, निवेदक, हास्यसम्राट अनंत खेळकर यांच्या अध्यक्षतेखाली शेगाव येथील मथुरा लॉनमध्ये वऱ्हाडी कट्टा या फेसबूक समूहाचा स्नेहमिलन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटक दैनिक अजिंक्य भारतचे संपादक, सुप्रसिद्ध वक्ते व पत्रकार पुरुषोत्तम आवारे पाटील हे होते. तर सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

विचारपीठावर निमंत्रित मान्यवरांमध्ये चंद्रकांत वानखडे पुणे,नरेंद्र इंगळे, विजय ढाले, विनायक भारंबे, गोपाल कोल्हे, सौ.कोल्हे, विजय पाटील इंगळे ,सुरेश नागले,तुळशीराम मापारी , प्रा .सदाशिव शेळके, सागर लोडम, नितीन वरणकार, संजय गुरव, शिवशंकर चिकटे, संतोष इंगळे, हिम्मत ढळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. सुरुवातीला स्व . उज्ज्वलभाऊ विभुते यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

उद्घाटक म्हणून बोलताना पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी वऱ्हाडी साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून व्यवस्थेवर प्रहार करावे. तसेच आपल्या साहित्यातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आणि समाजवास्तव मांडावे, असे आवाहन केले. यावेळी बोलताना सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांनी बोलीच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या आयोजकांचे मनापासून कौतुक केले .कट्ट्याच्या वतीने होत असलेल्या प्रयत्नांना समाजाने साथ द्यावी, असे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगतातून ॲड. अनंत खेळकर यांनी वऱ्हाडी कट्ट्याच्या बोली संवर्धनविषयक उपक्रमाचे कौतुक करून आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभव शब्दबद्ध करण्याचे आवाहन केले. यावेळी कवी चंद्रकांत वानखडे, पुणे व गोपाल कोल्हे यांचीही भाषणे झाली.

या कार्यक्रमात वऱ्हाडी कट्ट्याच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध कथाकार विजय पाटील इंगळे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अंकुश इंगळे पनवेल, नितीन देशमुख अमरावती , वृषाली देवकर परतवाडा ,अरविंद उन्हाळे भोन, राम पळसकर शहापूर यांना विविध साहित्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले . वऱ्हाडी कट्ट्याच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त आयोजित चारोळी, लघुकथा तसेच फिशपॉन्ड स्पर्धेतील विजेते तसेच कट्ट्यावर दैनिक व साप्ताहिक स्तंभलेखन करणाऱ्या स्तंभ लेखकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच ॲडमिन पॅनलचे राम पळसकार, लक्ष्मण दारमोडे, डॉ . लक्ष्मण उगले, राजेश गिरे, कुशल राऊत, नितीन वानखडे यांचा मंचर टोपी व श्रीफळ देऊन तर उज्ज्वलाताई कांबळे यांचा साडीचोळी देऊन वऱ्हाडी कट्टा सदस्यांनी सत्कार केला .यावेळी विविध साहित्यिकांची पुस्तके व विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

स्नेहमिलन सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ कवी तुळशीराम मापारी यांचे अध्यक्षतेखाली काव्य मैफीलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये चंद्रकांत वानखडे, नितीन वरणकार, विलास ठोसर,सतीश दराडे, चारुदत्त मेहेरे ,अरविंद उन्हाळे,अंकुश इंगळे, किशोर भुजाडे, अशोकराव दशमुखे, गजानन निमकर्डे, रामदेव सित्रे, कुशल राऊत, ॲड रजनी बावस्कर, जयश्री रोहणकर, अंजली खोरखेडे , अनिता देशमुख – सरदार यांनी आपापल्या रचना सादर केल्या. काव्यमैफीलीचे निवेदन ॲड. शिवाजी खाडे यांनी केले . स्नेहमिलन सोहळ्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या कट्टेकरी भगिनींचा साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद शिंगाडे, चंद्रशेखर महाजन व ॲड.रजनी बावस्कर यांनी केले . प्रास्ताविक नितीन वानखडे यांनी तर आभार प्रदर्शन उज्वला कांबळे यांनी केले. स्नेहमिलन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी नितीन वरणकार लक्ष्मण दारमोडे, राजेश गिरे, डॉ. लक्ष्मण उगले, कुशल राऊत, राम पळसकर यांचेसह वऱ्हाडी कट्ट्याच्या अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले. स्नेहमिलन सोहळ्याला मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावतीसह महाराष्ट्र तसेच राज्याबाहेरील विविध ठिकाणांहून कट्टेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button