ओबीसी समाजाला घटनात्मक आरक्षण द्या मंत्री छगन भुजबळ यांची मागणी- चंद्रपूर येथे मंत्री छगन भुजबळ यांचा कृतज्ञता सोहळा संपन्न
ओबीसींच्या प्रश्नांसाठी महाविकासआघाडी कायम लढत राहणार - मंत्री छगन भुजबळ
चंद्रपूर- दि.१९ ऑक्टोबर !ओबीसी वर्गाच्या आरक्षणासंदर्भात अनेक वर्षे प्रश्न निर्माण केले जात आहेत त्यामुळे ओबीसी समाजाला सुद्धा घटनात्मक आरक्षण दिले पाहिजे अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले. आदिवासी बहुल आठ जिल्ह्यातील कमी झालेले ओबीसी आरक्षण पूर्ववत केल्यामुळे चंद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्यामार्फत मंत्री छगन भुजबळ यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, सुबोध मोहिते,माजी खासदार मधुकरराव कुकडे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य , शहराध्यक्ष राजीव कक्कड, डॉ.अशोक जीवतोडे,महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष जगदीश जुनगरी, देवीताई उईके, यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी चंद्रपूर-गडचिरोलीसह आठ जिल्हातील ओबीसींच्या कमी झालेल्या आरक्षणासाठी राज्य सरकारने मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या समितीच्या शिफारशी राज्य सरकारने स्वीकारल्या आणि ओबीसींचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत केल्याबद्दल मंत्री छगन भुजबळ यांचा कृतज्ञता सोहळा पार पडला आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या सत्कार करण्यात आला यावेळी हा फक्त माझा सत्कार नसून महाविकास आघाडीचा सत्कार असल्याचे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.ओबीसींच्या आरक्षणासंबंधीत प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून महाविकास आघाडीही ओबीसी आरक्षणासाठी प्रत्येक आघाडीवर लढत राहणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
ते म्हणाले की, आम्ही फुले-शाहू-आंबेडकर यांचे अनुयायी आहोत त्यामुळे ओबीसी आरक्षणा संदर्भात आम्ही लढतच राहणार आहोत. आज काही पक्ष आपल्या राजकीय फायद्यासाठी ओबीसींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळेच ओबीसी समाजाला आरक्षणाची वस्तुस्थिती सांगण्यासाठी विदर्भात आलो असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी समाजाचे स्थगित झालेले राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावे यासाठी आम्ही अध्यादेश काढला आहे.
महाराष्ट्रात खोटा इतिहास सांगण्याचे काम चालू आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे खोटे वारसदार उभे करून समाजाला फसवण्याचे काम सुरू आहे या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन देखील त्यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेप्रणाने देश चालला पाहिजे कोणाचीही मुस्कटदाबी करता कामा नये असे मत त्यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडी एकत्रच
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की तीन पक्षांचे सरकार असले तरी आम्ही एक आहोत महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नाही. जेंव्हा भिन्न मत असतात तेव्हा आम्ही एकत्रित बसुन चर्चा करून निर्णय घेत असतो. आगामी काळात येणाऱ्या निवडणूका एकत्रित लढण्याचा सर्वांचा मानस आहे मात्र यासाठी आम्ही एकत्रित बसून निर्णय घेऊ.