हातात जादू असणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे ओबीसी-प्रा. हरी नरके

ओबीसी म्हणजे प्रामुख्याने बारा बलुतेदार, अठरा अलुतेदार म्हटल्या जातात. असे लोक कारू-नारू, कष्टकरी, हातांमध्ये कौशल्य असणारे, ज्यांच्या हातामध्ये जादू आहे असे लोक, या देशाच्या संपत्तीमध्ये भर घालणारे लोक, ज्यांनी अजिंठा-वेरूळ खोदले, ज्यांनी ताजमहाल बांधला, ज्यांनी धरणे उभी केली, त्यांनी कारखाने चालवली, त्यांनी शेती पिकविली असे कास्तकार, कारागीर लोक. हातामध्ये जादू असणारे लोक.
आजच्या परिस्थितीत ओबीसी बद्दल बोलताना तीन लोकांचा उल्लेख महत्त्वपूर्ण आहे तो पुढीलप्रमाणे.
१) विजय भटकर
भारत जगामध्ये पाचव्या क्रमांकाचा देश एका संशोधनामुळे ठरला. ते म्हणजे परम महासंगणक (Super Computer) होय. तो भारताने बनवला, तोपर्यंत जगात फक्त चारच देशांनी तो बनवला होता आणि कोणताही देश भारताला सुपर कॉम्प्युटर द्यायला तयार नव्हते. Super Computer बनवून जगात भारताला पाचव्या क्रमांकाचा देश बनविण्याचे काम विदर्भातील एका कुणबी कुटुंबातील मुलाने केले. त्याचं नाव विजय भटकर. हा ओबीसी मधला माणूस. ज्या संगणकाशिवाय कोणाचे काहीच चालत नाही. अक्षरशा मोबाईल सुद्धा. अतिशय बुद्धिमान, चाणाक्ष, हुशार असे ओबीसी आहेत.
२) सॅम पित्रोदा (Sam Pitroda)
भारतात एकूण लोकसंख्या जवळपास 130 कोटी असून त्यापैकी 125 कोटी लोकांकडे मोबाईल आहेत. आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे. हे मोबाईल संपर्क क्रांतीचे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या व्यक्तीचे नाव सॅम पित्रोदा असे आहे. त्यांचे पूर्ण नाव सत्यनारायण गंगाराम पित्रोदा हे आहे. हे संपर्क क्रांती, संचार क्रांतीच्या पाया भरण्याचे काम यांनी केले, ते सुद्धा एक ओबीसी आहेत.
३) जगन्नाथ नाना शंकर शेठ
भारतामध्ये रेल्वे आली आणि एक वेगळं जग सुरू झालं भारतात १८५३ मध्ये पहिल्यांदा रेल्वे आली. ती इंग्रजांनी आणली असे आतापर्यंत आपल्याला माहिती होते. परंतु रेल्वे भारतात आणणारी कंपनी होती GIP RAILWAY (Great Indian Peninsula Railway). या कंपनीची स्थापना कोणी इंग्रज अधिकाऱ्यांनी नव्हे तर भारतीय नाना जगन्नाथ शंकरशेट यांनी केली होती. तेसुद्धा ओबीसी होते.
अशा कर्तबगार असणाऱ्या, हातात कौशल्य असणाऱ्या, देश घडवणाऱ्या, देशाच्या नैसर्गिक संपत्तीत वाढ करणार्या अशा लोकांचा समूह म्हणजे ओबीसी होय. भारतात प्रत्येक दोन पैकी एक व्यक्ती ओबीसी आहे. 50 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या असणारा हा समूह विविध जातीत विभागलेला आहे.
प्रा. हरी नरके (सदर लेख हा त्यांच्या दि.२५ सप्टेंबर २०२१ रोजीच्या प्रबोधन शिबीर शेगाव येथील भाषणातील भाग आहे.)